सातारा – वीज वितरणच्या सातारा जिल्ह्यातील 2700 कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून 72 तासाचा संप पुकारल्याने त्याचे प्रत्यक्ष परिणाम सातारा जिल्ह्यात दिसू लागले आहेत. पर्यायी व्यवस्थेचा विविध वितरण यंत्रणेने दावा केला असला तरी सातारा शहरांमध्ये आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये विजेचा लपंडाव सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होता.
महावितरण महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजाला सुद्धा या संपाचा फटका बसला आहे. कृष्ण नगर येथील कार्यालयासमोर वीज वितरणच्या आस्थापनेवर असणाऱ्या अभियंता अधिकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ग्राहक राजा जागा हो, अदानी गो बॅक जनतेचे वीज मंडळ खाजगी भांडवलदारांच्या घशात जाऊ देणार नाही अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या.
संपामुळे कृष्णानगर, प्रतापगंज येथील मुख्य आणि विभागीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना अभावी अक्षरशः शुकशुकाट होता. सातारा जिल्ह्यातील 11 सबस्टेशन आणि सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील उपकेंद्रांवर कंत्राटी स्वरूपाच्या सव्वाशे कर्मचाऱ्यांची टप्प्याटप्प्याने नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भामध्ये महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे सातारा जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी माहिती दिली. आऊटसोर्सिंग द्वारे सातारा वीज वितरणसाठी काम करणारे बाराशे हंगामी कर्मचारीसुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा शहरांमध्ये सकाळपासून वीज पुरवठा वारंवार खंडीत होत होता. सकाळी तब्बल दीड ते पावणे दोन तास वीस गुल होती. त्यामुळे काही ठिकाणी नगरपालिकेच्या पाणी उपसा प्रणालीला सुद्धा त्याचा फटका बसला सातारा शहराला 20 एम एल डी पाण्याची गरज असते मात्र वीज पुरवठा अभावी केवळ 16 एमएलडीच पाणीपुरवठा होऊ शकला त्यामुळे कुठे कुठे साधारण पाण्याची टंचाई जाणवली.
सातारा जिल्ह्यातील घरगुती ग्राहक पाणीपुरवठा केंद्रीय रुग्णालय, मोबाईल टॉवर, सरकारी कार्यालय आदींचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अखंडित वीज पुरवठ्यासाठी आपत्कालीन यंत्रणा 24 तास सज्ज ठेवण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून दर तासाला वीज पुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल नागरिकांनी कोणत्याही नकारात्मक आणि चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे.
85 टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी
सातारा जिल्ह्यातील 72 तास चालणाऱ्या या संपामध्ये महानिर्मिती महापारेषण महावितरण सरकारी कंपन्यांचे कर्मचारी सहभागी झाले असून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियननेही यांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. तीन कंपन्यांमध्ये सुमारे 90 हजार कर्मचारी असून यातील 85 टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. समांतर वीज वितरण प्रणाली आणि बिल व्यवस्था या व्यवस्थेच्या खाजगीकरणाच्या विरोधात हा लढा दिला जात आहे. महापारेषण महावितरण या सर्व कंपन्या व्यवस्थित ग्रामीण भागामध्ये सक्रीय असताना खाजगीकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा थेट सवाल आंदोलकांनी केला आहे.