नेवासा – अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ नेवासा येथे बुधवारी सकल मराठा समाज बांधवांचा मोर्चाद्वारे एल्गार पहावयास मिळाला. हजारोंच्या संख्येने निघालेल्या निषेध मोर्चामध्ये सर्वधर्मीय व सर्वपक्षीय बांधबांनी पाठिंबा देत मोर्चात सहभाग नोंदवला. मराठा आरक्षणासाठी आता सरकारने अंत पाहू नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नेवासा येथील श्री मळगंगा देवी मंदिर प्रांगणापासून मराठा क्रांती मोर्चाला प्रारंभ झाला. अग्रभागी घोड्यावर स्वार झालेले मावळे, त्यामागे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, हातामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज घेतलेले युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक असे या मोर्चाचे स्वरूप होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. खोलेश्वर गणपती मंदिर चौकात उभारण्यात आलेल्या मंचवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. यावेळी पुतळ्यास पुष्पहार घालून हजारोंच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना आरतीद्वारे अभिवादन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ऍड.अण्णासाहेब अंबाडे यांनी हजारो समाज बांधवांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी सोनई येथील स्नेहल दरंदले, पूनम दरंदले,ऋतुजा रौंदळ, श्रावणी कर्डीले, तेजलग गोसावी, साक्षी उभेदळ, ऋतुजा कोकणे,राणी दरंदले, सुहानी भिंगारदे, राहुल पेरणे यांनी भाषणातून हजारो बांधवांना मंत्रमुग्ध केले. या विद्यार्थिनींनी 2017 साली आरक्षणाचे गाजर सरकारने दाखवले व स्वतःच त्याचा हलवा खाल्ला, अशी टीका केली. मराठा समाज दगडफेक करणारा नाही तर दगड वाचवणारा असल्याचे सांगत, आमचा तवा तापून करपून गेला, मात्र आम्हाला आरक्षणाची त्यावर भाजता आली नाही, अशी भावना व्यक्त केली.
भीक नको तर हिसकावून घेण्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले. मागण्यांचे निवेदन पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीताने मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली. नेवासा फाटा येथील व्यापारी बांधवांनी नेवासा येथे काढण्यात आलेल्या मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शवत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.