खंडाळा, (प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्यामधील बहुतांश भागांमध्ये दि. २० मे रोजी झालेल्या वादळी वारा व पावसाने महावितरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत वीज पुरवठा ठप्प झाला होता. यावर महावितरण विभागाच्या सर्व अभियंता व कर्मचारी वर्गाद्वारे तब्बल ४८ तासांच्या अविरत मेहनतीनंतर वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. २० तारखेला खंडाळा, शिरवळ, अहिरे या गावांसह तालुक्यातील संपूर्ण पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर वादळी वारे व पाऊस झाल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. यामध्ये उच्चदाब वाहिनीचे ४२ पोल, लघुदाब वाहिनीचे १०५ पोल व १४ वाहिनी दुर्घटनाग्रस्त झाल्याने महावितरण विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तसेच वीजपुरवठाही ठप्प झाला होता.
विजेविना नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते यावर महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता रणजीत चांदगुडे, अभियंता प्रवीण महांगरे, सहाय्यक अभियंता सुरंजीत रॉय, वैभव भोसले, हर्षद मुळीक, दादा बारवकर, सोमनाथ धायगुडे तसेच सर्व कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टर या सर्वांनी अहोरात्र झटून केलेल्या कार्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणाला यश आले. महावितरण विभागाच्या कार्यामुळे या सर्वांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.