जळगाव – डॉ. उल्हास पाटील यांच्या मेडिकल कॉलेज यासह वेगवेगळ्या आस्थापना आहेत. त्यात अनियमितता असू शकते, मोठमोठे पैशांचे व्यवहार होतात. त्यामुळे हा काळा पैसा ठेवायचा कुठे? ही भीती असते. या भीतीपोटी डॉक्टर उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.
दरम्यान पुढे बोलताना खडसे म्हणाले की, ज्या-ज्यावेळी शरद पवारांना ईडीची नोटीस झाली त्या त्यावेळी सहानुभूतीचे मोठी लाट आली. विरोधी पक्षाचे असल्यामुळे सरकारकडून छळण्याचा प्रकार सुरू आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या यंत्रणांच्या या माध्यमातून विरोधी पक्षांना जाणीवपूर्ण टार्गेट केले जात आहे. सत्ताधारी पक्षाचे सर्वच स्वच्छ कसे? विरोधकांना नामोहरम करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे.
शिवसेनेकडूनच भाजपला युतीचा प्रस्ताव आला होता याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि त्या प्रक्रियेत मी होतो. त्यानंतरही भाजपने सर्व जागांवर आपले उमेदवार लढविण्यासाठी अनेक मान्यवरांचा पक्षात प्रवेश करून घेतला होता. यात काही जागा या शिवसेनेच्या असताना सुद्धा त्या ठिकाणी भाजपने मान्यवरांचा प्रवेश केला, म्हणजेच या जागा सुद्धा भाजपला लढायच्या होत्या. ज्यावेळी भाजपला आता सर्व जागा या स्वबळावर लढू शकतो, असा विश्वास आला त्यावेळी युती तोडण्याचा निर्णय हा झाला. त्यानंतर मग जागा वाटपाचं कारण समोर करून शिवसेनेसोबत युती तोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पक्षाच्या आदेशाप्रमाणे युती तुटली असे मी जाहीर केले, असा दावा त्यांनी केला आहे.
केंद्राविरोधात जनमत
इंडिया आघाडीतून अनेक जण बाहेर पडतात, अनेक जण आतमध्ये येतात. यालाच आघाडी म्हणतात. एखादा व्यक्ती गेली, एखादा पक्ष गेला त्यापेक्षा जनतेचे काय मत आहे हे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आज देशामध्ये जनमत हे तयार झालेले आहे, असे त्यांनी ममता बॅनर्जीच्या भूमिकेवर म्हटले आहे.