जिनिव्हा – येत्या 15 नोव्हेंबरला जगाची लोकसंख्या 8 अब्ज होणार आहे. पृथ्वीवरील मानवाच्या प्रगतीचा हा एक महत्वाचा टप्पा असणार आहे. पोषक अन्न, वैयक्तीक निगा आणि औषधांच्या योग्य वापरामुळे मानवी आयुर्मयादेमध्ये वाढ झाल्यामुळे हे शक्य होते आहे. काही देशांमधील उच्च आणि सातत्यपूर्ण जन्मदरामुळेही मानवाची लोकसंख्या या टप्प्यावर पोहोचू शकली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विषयक विभागाने “वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2022′ या अहवालात 11 जुलै रोजीच्या जागतिक लोकसंख्या दिनी जगाच्या लोकसंख्येबाबतचे भाकित वर्तवले होते. मात्र जगाची लोकसंख्या 8 अब्ज होण्याचा हा दिवस अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
या अहवालानुसार लोकसंख्येबाबत भारत 2023 मध्ये चीनला मागे टाकेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2050 पर्यंत कॉंगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपाईन्स आणि टांझानिया या 8 देशांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लोकसंख्या वाढलेली असेल, असेही या अहवालात म्हटले गेले आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या 4 अब्ज होती.
त्यानंतर केवळ 48 वर्षात नोव्हेंबर 2022 मध्ये जगाची लोकसंख्या दुपटीने वाढून 8 अब्ज होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्राने वर्तवला होता. जगाची लोकसंख्या 7 अब्जांवरून 8 अब्ज होण्यासाठी केवळ 12 वर्षे लागली होती. आता जगाची लोकसंख्या 8 अब्जांवरून 9 अब्ज होण्यासाठी केवळ 15 वर्षे लागतील. म्हणजे 2037 मध्ये लोकसंख्या 9 अब्ज होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वसाधारण विकास दर मंदावत असल्याचे हे निदर्शक आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या 2030 मध्ये 8.5 अब्ज, 2050 मध्ये 9.7 अब्ज आणि 2080 मध्ये 10.4 अब्ज होईल, असा अंदाज आहे. 2100 पर्यंत जगाची लोकसंख्या या सर्वोच्च स्थानी कायम राहण्याचाही अंदाज आहे.