खडकवासला : हवेली तालुक्यातील सिंहगड परिसरात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मणेरवाडी गावच्या स्मशानभूमी लगत आसपासच्या झाडीत आचानक रानगवा शिरला. शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला. ते पाहताच क्षणी शेतकरी जीव मुठीत धरून पळाले. काही शेतकरी झाडावर चढले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले, असे तानाजी भोसले यांनी सांगितले.
अचानक थोपटेवाडी गावच्या हद्द्दीत रानगव्याचे आगमन झाल्याने मणेरवाडी, थोपटेवाडी, खानापूर परिसरात एकच धुमाकूळ माजला गेला. नागरिकांनी या संबंधित वनविभाग कार्यालयाला माहिती दिली. तेव्हा त्वरित वनविभाग दखल घेत संपूर्ण परिसर सील केला. संबंधित यंत्रणा मणेरवाडीतील थोपटेवाडीत पोहचताच रानगव्याचा धुमाकुळ सुरु झाला. गव्याला पकडण्यासाठी गावकरी, वनविभाग व पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत होते.
परिसरात भितीचे वातावरण निर्माण होऊन नागरिक गावाकडे पळ काढताना दिसून येत होते. तेव्हा संबंधित वन विभाग परिसरातील गावाना नागरिकांना अलर्ट करताना दिसून येत होते. पाण्याच्या शोधात रानगवा गावात आला असावा असे मत गावक-यांनी व्यक्त केले. उशीरापर्यंत रान गव्याला पकडण्यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहेत. वनविभाग टीम बरोबर गावपातळीवरील कार्यकर्त्यांची मदत घेऊन वनविभाग कार्य करत आहेत.
“जंगलाचा मोठा परिसर असल्याने गव्याला पकडणे अवघड आहे. मात्र त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. तसेच गव्याला नैसर्गिक अधिवासाकडे हकलून लावण्यात येणार आहे. शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच गवा भेदरून जाईल असे कोणतेही कृत्य करू नये,” असे आवाहन भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप संकपाळ यांनी केले आहे.