पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर महापालिकेने वाहतूक नियोजनासाठी उपाययोजना केल्या होत्या. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध ठोकण्यात आलेले खिळे तसेच लोखंडी राॅड आता बाहेर आले आहेत. यामुळे दुचाकी तसेच भरधाव वाहने अपघातग्रस्त होण्याचा धोका असून, वर्दळीच्या रस्त्यांवर हे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासन हे खिळे काढणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने तात्पुरत्या उपाययोजना केल्या होत्या. त्यासाठी रस्त्यावर लोखंडी बॅरिकेड्स अथवा प्लॅस्टिकचे बोलर्ड, रम्बलरचे गतिरोधक उभारले गेले. मात्र, अवघ्या काही दिवसांतच यातील बहुतांश साहित्य तुटले. हे साहित्य बसवताना लावलेले खिळे तसेच राॅड मात्र तसेच सोडले जात आहे. ते धोकादायक स्वरुपात जवळपास एक ते दीड इंचांपर्यंत रस्त्यावर दिसत आहेत. यामुळे वाहनांचे टायर फाटण्याचा धोका आहे.
खिळे आणि राॅड रस्त्यावर असलेली ठिकाणे
१. छत्रपती शिवाजी महाराज पुलाखालून बालगंधर्व रंगमंदिराकडे जाताना दहा ते बारा लोखंडी राॅड बाहेर आले आहेत.
२. सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूलाचे काम सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन ते चार ठिकाणी राॅड तसेच लोखंडी जाण्यांचे गज बाहेर आलेले आहेत
३. विधी महाविद्यालयासमोर प्लॅस्टिकच्या बोलार्डसाठी लावलेले खिळे बाहेर आलेले आहेत.
४. कर्वे रस्त्यावर गरवारे महाविद्यालयासमोर एक राॅड रस्त्यावर दिसून येत आहे.
महापालिकेसमोरून जाताना अचानक राॅडवर वाहनाचे चाक गेले. चाक पंक्चर झालेच, पण टायरही फाटले आहे. वाहनाचा वेग कमी असल्याने अपघात टळला. मात्र, हे राॅड तातडीनेकाढणे आवश्यक आहे. – साईनाथ जाधव, वाहनचालक