पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वीजपुरवठा खंडित करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. याप्रकरणी महावितरणने नुकतेच एक आव्हान केले होते. त्यानंतरही नागरिक बळी पडत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे.
यामुळे वीज बंद झाल्यास उकाड्याने त्रस्त होण्यापेक्षा बिल भरलेले बरे, अशा जाणिवेतून अनेकजण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेकांनी वीजबिल भरलेले असते किंवा वीजबिल अद्याप आलेले नसते, तरीही ते फसले जात आहेत.
याच प्रकारे चोरट्यांनी पर्वती भागातील एका महिलेची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चाेरट्यांनी संदेश पाठवून महावितरणमध्ये अधिकारी असल्याची बतावणी केली. त्याने वीज देयक थकीत आहे.
पैसे न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा संदेश चोरट्यांनी पाठविल्यानंतर महिलेने संदेशातील क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी महिलेला क्विक सपोर्ट ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. संबंधित ॲप डाउनलोड करताना महिलेकडून बँक खात्याची माहिती घेतली आणि त्याआधारे त्यांच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने तीन लाख ४९ हजार ६८० रुपये चोरले.
फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यावर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक गावित तपास करत आहेत.
पावणेचार लाखांची फसवणूक
वीजपुरवठा खंडित करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एकाची तीन लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार वडगाव बुद्रुक भागात राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला व थकीत वीजबिल न भरल्यास पुरवठा खंडित करण्याची धमकी चोरट्यांनी त्यांना दिली. तक्रारदार घाबरले. त्यांनी वीजपुरवठा खंडित करु नका, असे सांगितले.
चोरट्यांनी त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. ॲपच्या आधारे चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन तक्रारदाराच्या बँक खात्यातून तीन लाख ६८ हजार २०० रुपये काढून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.
…म्हणून महावितरण टार्गेट
महावितरणने वीजबिल भरण्यासह इतर सेवा ऑनलाइन केल्या आहेत, तसेच ते ग्राहकांना मेसेजही पाठवत आहेत. नेमकी हीच बाब हेरून सायबर भामट्यांनी आर्थिक गंडा घातला आहे. त्यामुळे सायबर भामट्यांचा कॉल किंवा मेसेजला ग्राहक बळी पडू लागले आहेत.
दोन वर्षांपुर्वी अशाप्रकारे फसवणूक होण्याचे प्रमाण मोठे होते. मात्र, सायबर पोलीस आणि महावितरणे जनजागृती केल्यावर प्रकार जवळपास बंद झाले होते. पूर्वी सायबर भामटे हिंदीतून बोलत असत. आता मात्र ते मराठी भाषेचा वापर करत असल्याने नागरिकांचा त्यांच्यावर सहज विश्वास बसत आहे.