श्रीरामपूर – नगर जिल्ह्यात जातीयवादी घटनांमागे षडयंत्र आहे का? याचा विचार व्हायला हवा. राजकीयदृष्ट्या ते काहींसाठी सोयीस्कर ठरत असावे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार देखील यामागे असू शकतो? याबाबत ठोस उत्तर नसले तरी याचा शोध घेणे गरजेचे आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडता कामा नये., असे मत माजीमंत्री व कॉंग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांनी आज श्रीरामपूर येथे व्यक्त केले.
हरेगाव येथे चार तरुणांचा अमानुष करण्यात आलेल्या मारहाण आली. त्या चारही तरुणांची रुग्णालयात जावून विचारपुस हंडोरे यांनी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी सभापती सचिन गुजर, अशोक कानडे, बाबासाहेब दिघे, युवक कॉंग्रेसचे हेमंत ओगले, भीमशक्तीचे संदिप मगर यावेळी उपस्थित होते.
हंडोरे म्हणाले की, सर्व आंबेडकरी संघटना, व्यापारी तसेच सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येत समिती गठित करावी. दोन समाजामध्ये सलोखा वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. जातीयवादी घटना घडणार नाहीत, यासाठी एकजुटीने प्रयत्न गरजेचे आहेत. जातीय अत्याचाराच्या सर्वाधिक घटना नगर जिल्ह्यात घडत आहेत. आरक्षित मतदारसंघांमध्ये अशा घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत का? हे तपासावे लागेल, असे हंडोरे म्हणाले.
हरेगाव येथील घटनेतील पीडित हे अल्पवयीन आहेत. त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर आरोपींवर मोक्काची कारवाई करावी. आरोपी नानासाहेब गलांडे याचा सावकारीचा व्यवसाय आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. काही घटना दहशतीमुळे दबलेल्या आहेत. त्यात कारवाई झालेली नाही. पीडितांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांना थुंकी चाटण्यास सांगितले गेले. पायाला जबर जखमा केल्या गेल्या.लघुशंका करण्यात आली. या प्रकारा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे हंडोरे यांनी सांगितले.