अहमदनगर – राहुरी मतदारसंघातील जनतेला आ. प्राजक्त तनपुरे यांनी मोठ-मोठी स्वप्ने दाखविली. मात्र, राहुरी शहरातीलच बस डेपो, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा योजना आदी मूलभूत कामे करू शकले नाहीत.आपले हे अपयश झाकण्यासाठी आ. तनपुरे स्टंटबाजी करीत आहेत. आपणच ठेके दिलेल्या ठेकेदाराला चांगले दर्जेदार कामे होत नाहीत. म्हणून धारेवर धरणे हा एक ड्रामाच आहे. पण जनता या भूलभूलैय्याला भूलणार नाही, अशी टीका भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परीषदेत केली.
आपल्या मर्जीतील अधिकारी असल्यावर कार्यकर्त्यांच्या दोन नंबरच्या व्यवसायांना अभय देता येते ही अडीच वर्षांच्या राज्यमंत्रिपदाच्या काळात भावना झाली. मात्र, आता सत्ताबदल होऊन सामान्य नागरिकांच्या दृष्टीने काम होत असल्याने फक्त राजकीय स्वार्थासाठी आ. तनपुरे यांनी तहसीलदार राजपूत यांच्यावर आरोप करून धरणे आंदोलनाचा स्टंट केला आहे, असा आरोप या वेळी केला.
सत्ता असताना गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांच्या वाळूच्या गाड्या सुरू होत्या. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. परंतु आता सत्ताबदल झाल्याने नव्याने आलेल्या तहसीलदारांनी कारवाई केल्याने आ. तनपुरे यांचा राजकीय स्वार्थ उघड झाला आहे. त्यामुळेच त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या नावाखाली आपण खरे जनतेचे कैवारी असल्याचे सोंग घेत जाणीवपूर्वक आरोप करून स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे.
निळवंडे धरण कालवा, वांबोरी चारी टप्पा 2, वावरथ जांभळीचा सेतू पूल या कामाचे काय झाले?, आपली सत्ता असताना आपण फक्त कार्यकर्ते व ठेकेदार सांभाळण्याचे काम केले. रस्ते व वीज रोहित्रांसाठी लोकप्रतिनिधींना निधी उपलब्ध करून दिला जातो; परंतु राज्यमंत्री म्हणून वेगळा काय निधी आणला हे अजून गुलदस्त्यातच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावात जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. याचे अनेक ठिकाणी उद्घाटने केली; परंतु जलजीवन योजनेसाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा फार्स वगळता कोणता पाठपुरावा केला, कुठे पत्रव्यवहार केला याचा एखादा कागद दाखवावा. ही योजना सर्व देशात सुरू आहे, फक्त राहुरी मतदारसंघात नाही. याची जाणीव लोकप्रतिनिधींना असायला हवी. आपली सत्ता असताना अधिकाऱ्यांना दबाव आणून कामे केली जात होती, म्हणूनच तालुक्याला अधिकारी टिकत नव्हते, याचे कारणही तालुक्याला माहिती आहे, असेही यावेळी सांगितले आहे. महात्मा फुले चौक रस्ता पांडुरंग लॉन्सपर्यंत होता. मात्र, अर्धवट स्थितीत काम सोडून दिले आहे, असे आर. आर. तनपुरे यांनी सांगितले.