श्रीगोंदा – जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज (मंगळवार) तालुक्यातील कोळगाव, काष्टी, वांगदरीसह अनेक ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी सकल मराठा समाजातर्फे सरकारचा निषेध करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर पोलीस यंत्रणेकडून झालेल्या लाठीचार्ज व मारहाणप्रकरणी मागील दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात अनेक ठिकाणी गाव बंद करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत असताना तालुक्यातील काष्टी, मढेवडगाव, वांगदरी, ढोकराई फाटा, कोळगाव, घारगाव याठिकाणी गावबंद आंदोलन करण्यात आले. परिसरात सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून, तसेच ठिकठिकाणी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या आंदोलनासाठी राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.