CJP Protest Pune: तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये भरपाई द्या! पुणे विद्यापीठातील आंदोलनात ‘हे’ ५ मोठे ठराव मंजूर
CJP Protest Pune: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा पाठिंबा.

CJP Protest Pune – नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हजारो विद्यार्थी आणि युवकांनी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन केले. कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली झालेल्या या आंदोलनाने विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासह शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
ज्येष्ठांचाही लक्षणीय सहभाग
दुपारी चारच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि पुण्याच्या सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ऍड. असीम सरोदे यांच्यासह विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. आंदोलक विद्यार्थ्यांच्या हातात पेपर लीक सरकार, लीक इन इंडिया, आमचे भविष्य आमचा अधिकार आणि सर्वांना शिक्षण, सर्वांना काम अशा आशयाचे फलक होते.
सत्य-अहिंसा हाच आमचा मार्ग : सोनम वांगचूक
पावणेसहाच्या सुमारास प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे आंदोलनस्थळी आगमन होताच तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना वांगचूक म्हणाले, की सरकारने शिक्षण आणि पर्यावरणावर गांभीर्याने काम केले पाहिजे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे गेलो, तरच खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या दिशेने जाता येईल. आमचे आंदोलन कोणत्याही विशिष्ट सरकारच्या विरोधात नसून, जनतेच्या प्रश्नांना जबाबदारीने उत्तर देणारे सरकार आपल्याला हवे आहे.
दीपके यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आंदोलक समाजात अराजकता पसरवत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला उत्तर देताना दीपके म्हणाले, की हक्कासाठी लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता पसरवणे आहे का? आम्हाला संविधान शिकवणाऱ्यांनी हे सांगावे, की चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या संविधानात लिहिले आहे? तरुण पिढी यापुढे कोणत्याही हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही.
पाच प्रमुख ठराव मंजूर
– पेपर फुटल्यास विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
– परीक्षा प्रक्रियेत कडक ऑडिट व्हावे. मंत्र्यांच्या नातेवाइकांना टेंडर देऊ नये.
– परीक्षेचा निकाल एका ठराविक मुदतीतच जाहीर झाला पाहिजे.
– विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रावर येण्या- जाण्याचा वाहतूक खर्च शासनाने उचलावा.
– एनसीईआरटीच्या पाठ्यापुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या
– हिंदवी साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यात यावा.






