रायपूर – भारताची वाढती लोकसंख्या म्हणजे सध्या टिकटिक करणारा टाइम बॉम्ब आहे असे मत विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे. या टाईम बॉम्बचा स्फोट आणि परिणामी दुष्परिणाम रोखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी कायदा तयार करण्याची गरज आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करतील आणि पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी समान नागरी कायदा आणतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष असलेले तोगडिया छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की लोकसंख्येच्या टाईम बॉम्बचा स्फोट झाल्यावर शहरे आणि खेड्यांमध्ये गृहयुद्धे होतील. त्यातून देशाची स्थिती अस्थिर बनेल.
भाजप सरकारने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणल्यानंतर केवळ हिंदूंचेच नव्हे, तर भाजपच्याही मतांचेही रक्षण होईल.भारत हे आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे आणि आम्हाला ते हिंदू राजकीय राज्य म्हणून स्थापित करायचे आहे. भारत हा हिंदू बहुसंख्य देश आहे आणि आम्ही भारतात कुठेही हिंदूंना असुरक्षित वाटू देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.