मुंबई – विरोधी पक्षांच्या “इंडिया’बाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे अस्वस्थ असल्याचा अफवा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार कुठेही जात नाहीत. या सर्व अफवा भाजपच पसरवत आहे.
बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीच्या पत्रकार परिषदेला नितीशकुमार उपस्थित नव्हते. कारण त्यांना राजगीरला परतायचे होते.त्यावरून भाजपने या अफवा पसरवल्या आहेत, असे ते म्हणाले.
विरोधी आघाडीचे नाव इंडिया असे ठेवण्यावर नितीशकुमार यांनी नाराजी व्यक्त केल्याचा सांगीतले जात आहे. पण जेडीयुनेही या बातम्यांचे खंडन केले आहे. जनता दल-युनायटेडचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह म्हणाले की बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे विरोधी ऐक्याचे मुख्य सूत्रधार आहेत आणि मंगळवारी बंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्षांच्या बैठकीत सहमतीने युतीसाठी इंडिया हे नाव निश्चित केले गेले. त्याबद्दल नितीशकुमार यांनी कोणतीही नाराजी किंवा आक्षेप घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.