जयपूर – गुर्जर समाजाचे नेते विजय सिंह बैंसला यांनी राहुल गांधींच्या राजस्थानमधील भारत जोडो यात्रेला विरोध करण्याची धमकी दिली आहे, जोपर्यंत सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याची त्यांची मागणी मान्य होत नाही आणि त्यांच्या समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही तो पर्यंत आम्ही ही यात्रा राजस्थानातून पुढे जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
यात्रा थांबवण्याची तयारी करण्यासाठी गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे नेते बुधवारपासून मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 3 डिसेंबरला राजस्थानात दाखल होणार आहे. यात्रा रोखण्याची धमकी बैंसला यांनी दुसऱ्यांदा दिली आहे.
बैंसला यांनी सोमवारी रात्री दौसा येथे पत्रकारांना सांगितले की, गांधींनी पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. राजस्थानातील सध्याच्या कॉंग्रेस सरकारला चार वर्षे पूर्ण झाली असून एक वर्ष बाकी आहे. आता सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे, पायलट यांना मुख्यमंत्री केले तर राहुल गांधी यांचे स्वागत आहे, अन्यथा आम्ही विरोध करू, असे ते म्हणाले.
राहुल गांधींच्या यात्रेवर नितेश राणेंचा आरोप,म्हणाले “भारत जोडोत सहभागी होणाऱ्या कलाकारांना पैसे…”
गुर्जर समाजाचा नेता मुख्यमंत्री होईल या अपेक्षेने 2018 मध्ये या समाजाने कॉंग्रेसला मतदान केले होते, असे ते म्हणाले.कॉंग्रेस सरकार समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आणि त्यांच्याशी संबंधित विविध प्रश्न सरकारकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा म्हणाले की, राज्यात यात्रा थांबवण्याचे धाडस कोणातच नाही.