नगर – उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण 75 टक्के तर जिल्ह्यात सर्वात मोठे धरण असलेले मुळा धरण 45 टक्के भरले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीपातळीवर कमालीची वाढ होत आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रतनवाडी परिसरात 120 मी.मी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील जीवनदायनी असलेल्या भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आइ ते दहा दिवसापासून पाऊस सुरू आहे. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून पासाचा जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याची आवक देखील वाढली आहे. त्यात गुरुवारी कळसुबाई, हिरश्चंद्रगड पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रात्री अशीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर तो कमी झाला. या पावसामुळे परिसरातील भात खाचरे ओसंडून वाहू लागले आहेत. डोंगर कड्यावरून धबधबे जोमाने कोसळत असून ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
भंडारदरा धरणात सकाळपर्यंत 440 दलघफु नवीन पाण्याची आवक झाली आहे. सकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठी 8 हजार 199 दलघफु झाला होता. तेव्हा हे धरण 74.27 टक्के भरले होते. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगडा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून आज सकाळी मुळा धरण 45. 56 टक्के भरले आहे. आज सकाळी कोतूळ जवळील मुळा नदीचा विसर्ग 7 हजार 667 क्यूसेक होता. मुळ धरणाचा पाणीसाठा 11 हजार 848 दलघफु झाला आहेत. तर निळवंडे धरणात 2 हजार 983 दलघफु पाणीसाठा असून हे धरण 36 टक्के भरले आहे.