Atal Setu – अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला उद्घाटन झाले. एकूण 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 21.8 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (MTHL) या पुलाला ‘अटल सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल असून तो देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. याद्वारे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.
उद्घाटनानंतर हा पुल सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अनेक वाहनचालक येथे सेल्फी, फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अटल सेतू हा पिकनिक स्पॉट बनला का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागला. येथे चारचाकी वाहनांसाठी वेग-मर्यादा 100 किलोमीटर प्रतितास ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास व वाहन उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही लोक आपला जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळाले. या गंभीर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र आता वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 264 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच सेतूवरून प्रवास करताना नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी दिला आहे. दरम्यान, अटल सेतू हा पिकनिक स्पॉट नसल्याचेही मुंबई वाहतूक पोलीस शाखेने म्हटलं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीट करत नागरिकांना आवाहन केले आहे.
We agree that Atal Setu is definitely ‘worth a watch’ but it’s also illegal to stop on it & click photos. You will face a FIR if you stop on MTHL. #MumbaiTransHarbourLink #MTHL #AtalSetu#FaceFIRIfYouStop pic.twitter.com/582CLgA72W
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) January 15, 2024
मुंबई वाहतूक पोलीस ट्वीट
“अटल सेतूचा नजारा पाहण्यासारखा नक्कीच आहे, पण या अटल सेतूवर थांबून फोटो काढणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या MHTL वर वाहने थांबून फोटो काढल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो,” असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच 21.8 किमी लांबीचा असलेला हा अटल सेतू पिकनिक स्पॉट नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना नागरिकांनी देखील नियम पाळून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.