Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेशच्या विझियानगरम जिल्ह्यात रविवारी (29 ऑक्टोबर) दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर झाली. या रेल्वे अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला, तर 50 प्रवासी जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, या अपघातानंतर अशाच काही वेदनादायक कहाण्या समोर आल्या आहेत, ज्या ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एक महिला होती. त्यांना दोन लहान मुले होती. याशिवाय मृतांमध्ये एका वीज कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथून इलेक्ट्रिशियनचा स्टॉप फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर होता.
नवविवाहित सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू –
29 वर्षीय सेल्स एक्झिक्युटिव्ह असलेल्या छल्ला सतीशचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह होता. अपघाताच्या वेळी ते विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनमधून प्रवास करत होते, ज्याची विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजरला धडक झाली.
स्टॉपपासून 5 मिनिटांच्या अंतरावर अपघात –
याशिवाय 35 वर्षीय विद्युत कर्मचारी कंचूबाराकी रवी यांनाही अपघातात जीव गमवावा लागला. रिपोर्टनुसार, तो अपघात स्थळापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अलमांडा रेल्वे स्थानकावर उतरणार होता. तो विशाखापट्टणम येथे खरेदीसाठी गेला होता.
घरी परतणाऱ्या महिलेला अपघातात जीव गमवावा लागला –
39 वर्षीय गिडिजला लक्षी या विशाखापट्टणमहून श्रीकाकुलमला घरी परतत होत्या. एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, घरी जात असताना रेल्वे अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्यामागे आता दोन मुले आणि पती आहे.
रायगडा पॅसेंजर ट्रेन चालकाचा मृत्यू –
रायगडा पॅसेंजर ट्रेनचा चालक एसएमएस राव यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. ते ईस्ट कोस्ट रेल्वेचे अनुभवी लोकोपायलट होते. 25 वर्षे ते लोकोपायलट राहिले. याशिवाय पलासा पॅसेंजर ट्रेन गार्ड एम श्रीनिवास यांचाही बळींमध्ये समावेश आहे. रविवारी (29 ऑक्टोबर) रात्री उशिरा विशाखापट्टणम रेल्वे रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
जखमींवर उपचार सुरू आहेत –
महाराजा सरकारी रुग्णालय, विझियानगरमच्या वैद्यकीय अधीक्षक अनिला सुंदरी यांनी सांगितले की, रुग्णालयात सुमारे 50 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी बहुतेकांच्या फासळ्या तुटलेल्या आहेत. त्याचबरोबर गंभीर जखमींना विशाखापट्टणम येथील रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली भरपाई –
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी विजयनगरमच्या सरकारी रुग्णालयात जखमींची भेट घेतली आणि प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि प्रत्येक जखमींना 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर राज्यातील लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली.