Amit Shah : अमित शाह सातार्याच्या लेकीला म्हणाले, “कोल्हापूर माझं सासर अन्…”; त्रिपुराच्या सीमेवरील ‘त्या’ प्रसंगाची जोरदार चर्चा
Amit Shah : भारत-बांगलादेश सीमेवर केंद्रीय गृहमंत्री आणि मराठी जवानामध्ये रंगली ज्वारीच्या भाकरीची चर्चा; शाहांनी आवर्जून सांगितली मुंबई-कोल्हापूरची आठवण.

Amit Shah – उच्च शिक्षणानंतर देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सीमा सुरक्षा दलात दाखल झालेल्या काशीळ, ता. सातारा येथील अस्मिता दीपक जाधव हिच्या वाट्याला अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण आला. भारत-बांगलादेश सीमेवर त्रिपुरा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफच्या जवानांशी नुकताच संवाद साधून, त्यांच्यासोबत स्नेहभोजन केले. या जवानांमध्ये अस्मिता जाधवचा समावेश होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरा दौर्यात बीएसएफ जवानांसोबत सहभोजन केले. देशाच्या सीमांचे रक्षण करणार्या जवानांचा सेवाभाव, शौर्य आणि समर्पणाचे त्यांनी कौतुक केले. जवानांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी, अनुभव आणि कार्यपद्धतीची माहितीही त्यांनी घेतली. या संवाद कार्यक्रमात अस्मिताला शहा यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी घडलेला एक प्रसंग उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.
अमित शाह यांनी अस्मिताला, तुम कहाँसे हो, असे विचारले असता, अस्मिताने अभिमानाने महाराष्ट्र, सातारा असे सांगितले. सातार्याचा उल्लेख होताच शाह यांच्या चेहर्यावर स्मितहास्य उमटले. कोल्हापूर मेरा ससुराल है और मेरा जन्म मुंबई में हुआ है, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते सांगितले. त्यामुळे या औपचारिक कार्यक्रमात क्षणभर आपुलकीचे आणि कौटुंबिक वातावरण निर्माण झाले.
यावेळी महाराष्ट्रातील कृषी आणि खाद्यसंस्कृतीबाबतही रंजक चर्चा रंगली. महाराष्ट्रात कोणती पिके घेतली जातात, याची विचारणा करत शहा यांनी ज्वारी, बाजरी आणि गव्हाचा उल्लेख केला. सातारा में ज्वार होता है क्या, असे त्यांनी विचारले. त्यावर, हाँ, हम ज्वार की रोटी खाते हैं, असे अस्मिताने सांगितले. या संवादातून महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती आणि खाद्य परंपरेबद्दलची शहा यांची आत्मीयता दिसून आली. देशाच्या गृहमंत्र्यांसोबत भोजन करण्याची संधी मिळणे, हा कोणत्याही जवानासाठी गौरवाचा क्षण असतो. भोजनावेळी शहा यांनी अस्मिताच्या कुटुंबीयांची आणि बीएसएफमधील प्रवासाचीही आत्मीयतेने विचारपूस केली.





