Satara: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क साथीच्या आजारांबाबत दक्षता; २४ तास मिळणार आरोग्य सेवा
Satara पावसाळ्यात घेण्याच्या काळजीबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक प्रकारे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ शकते. अशा वेळी लोकांना २४ तास आरोग्य सेवा देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Satara: पावसाळयामध्ये कोणत्याही प्रकारची जलजन्य अथवा कीटकजन्य आजाराची साथ पसरु नये यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहून २४ तास आरोग्य सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
पावसाळ्यात घेण्याच्या काळजीबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक प्रकारे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ शकते. अशा वेळी लोकांना २४ तास आरोग्य सेवा देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती, दरडी कोसळणे इत्यादीवर वेळेत नियंत्रणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १० जूनपूर्वी कार्यशाळांचे नियोजन आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, तालुका पंचायत अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्रकल्प अधिकारी (आयसीडीएस), गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण व आरोग्य) या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. मान्सूनपूर्व नियोजनामध्ये नियंत्रण कक्ष, दैनंदिन पाणी शुध्दीकरण, टीसीएल साठा व गुणवत्ता, पाणी नमुने सनियंत्रण या बाबींवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्याबाबत गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे डॉ. खलिपे यांनी सांगितले.
तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळयात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पूर, वादळी वारे, वीज कोसळणे, झाडे, घरे पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णवाहिका, औषध दुकानांची माहिती केंद्रस्तरावर उपलब्ध करुन त्यांना नैसर्गिक आपत्तीवेळी सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करण्याबाबत सूचित केले आहे.
नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र आपतकालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पावसाळयामध्ये जलजन्य आजाराची साथ उदभवू नये, यासाठी नागरिकांनी पाणी उकळून, गार करून प्यावे. तसेच पाणी शुदधीकरणासाठी मेडिक्लोअरचा वापर करावा, असे आवाहन डॉ. खलिपे यांनी केले आहे.
रुग्णवाहिका, औषध कीट आणि वैद्यकीय पथक तयार करुन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही क्षणी सेवा देण्यासाठी पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने केंद्रस्तरावर वैद्यकीय पथकाची स्थापना करुन यामध्ये वैद्यकीय अधिकारी ते शिपाई केडरचा प्रत्येक कर्मचाऱ्याचा समावेश करावा, दूरध्वनी, इनव्हर्टर, जनरेटर सुरु स्थितीत असावेत. केंद्राकडील स्ट्रेचर, व्हील चेअर, आणि यासारखे तत्सम साहित्य सुस्थितीत तयार ठेवावे. वाहन सुस्थितीमध्ये व सुसज्ज ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.





