Satara: 102 रुग्णवाहिका बेकायदेशीररित्या रस्त्यावर; जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांचा प्रशासनावर हल्लाबोल
Satara जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे की, आरटीओ कार्यालयाकडून प्राप्त नोंदींच्या अभ्यासातून अनेक वाहनांची कागदपत्रे मुदतबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Satara: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ताब्यातील 102 रुग्णवाहिकांसह 90 हून अधिक वाहने विमा, फिटनेस, पासिंग, पीयूसी आणि इतर आवश्यक कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा गंभीर आरोप करत, जिल्हा परिषद सदस्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. याप्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे की, आरटीओ कार्यालयाकडून प्राप्त नोंदींच्या अभ्यासातून अनेक वाहनांची कागदपत्रे मुदतबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरदेखील ही वाहने शासकीय कामे आणि नागरिकांच्या सेवेसाठी वापरली जात आहेत. या वाहनांमधून गरोदर माता, गंभीर रुग्ण, नवजात बालके आणि आरोग्य कर्मचारी प्रवास करतात. अशा वाहनांचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळणार नसून, नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर प्रशासकीय नियंत्रणाची जबाबदारी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात अनियमितता कशी घडली, असा सवाल करताना, शेळके यांनी त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्काराच्या निकषांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, संबंधितांवर शिस्तभंग व फौजदारी कारवाई, सर्व वाहनांची विशेष तपासणी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विशेष लेखापरीक्षण करावे. सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही शेळके यांनी दिला आहे.





