अमोल मतकर
संगमनेर – शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पुन्हा चर्चेत आले असून, आता वाळूबरोबरच गोमांसच्याही गाड्या सोडल्या जाऊ लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील जमजम कॉलनीजवळ काही तास एक गोमांसने भरलेली पिकअप गाडी काही वेळाने जुना कोल्हेवाडी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाशेजारी आर्थिक तडजोड करून सोडून देण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मांडवा रस्त्यावर बिरेवाडी फाट्यानजीक एक वाळूची गाडी शनिवारी रात्री पकडली, परंतु ती प्रत्यक्षात पहाटे सहा वाजता पोलिस ठाण्यात पोहोचली आणि सहा आरोपींऐवजी दोन आरोपी दाखवून तडजोड केल्याचे समजते. त्याच पांढऱ्या गाडीतील दोन कर्मचारी आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर दोन जणांकडून तडजोड केली जात असून, नाकापेक्षा मोती जड झाल्याचे दिसून येते.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात असूनही या कायद्याला संगमनेर शहरात मात्र पायदळी तुडवण्याचे काम प्रशासनाकडूनच होत असल्याचे दिसून येते. गुरुवारी रात्री साकूर गावात एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर लाखाची तडजोड करून सोडून देण्यात आला. शुक्रवारी रात्रीपासून गोवंश करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून असलेले एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पथकाचा डाव फसला. मात्र, शुक्रवारी रात्री 12च्या दरम्यान एक पिकअप गाडी गोमांस घेऊन निघाली असता जमजम कॉलनीजवळ ते पथक एका पांढऱ्या रंगाच्या गाडीत आले आणि त्यांनी काही वेळ ती गोमांसने भरलेली गाडी एका ठिकाणी उभी ठेवली. नंतर जुना कोल्हेवाडी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ तब्बल 80 हजारांची तडजोड करत त्या गाडीला सोडून देण्यात आले. पथकाच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत प्रशासनाचे दोन आणि त्यांचे दोन खासगी साथीदार असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
दुसरी घटना तालुक्यातील मांडवा रस्त्यावर बिरेवाडी फाट्यानजीक घडली. एका गाडीचा पाठलाग ते पथक पांढऱ्या रंगाच्या गाडीत करत होते. पण दुर्दैवाने ती गाडी एका झाडाला आदळली आणि तिचा टायर फुटला. त्यानंतर त्या पथकाने त्या गाडीला ताब्यात घेतले असताना गाडीचा दुसराही टायर फुटला. त्यानंतर टायर आणून त्या गाडीला बसवण्यात आला. म्हणजे पोलीस ठाण्यात वाहन नेत असताना दोनदा त्या गाडीचा टायर फुटल्याने त्या पथकातील कर्मचाऱ्यांना तडजोड करण्यास वेळ मिळत होता. दरम्यान, या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचे समजते. प्रत्येकी एक लाख रुपयांची मागणी करून प्रत्येकाचे नाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शेवटी दोन आरोपी दाखवून आज पहाटे सहा वाजता ती गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली.
जामिनानंतर कसायाचा धंदा जोमात सुरू
शहरातील एकूण छोटे-मोठे बारा कत्तलखाने सुरू असल्याची माहिती समोर आली असून, कसायांनी प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा सुरू केल्याचे समजते. दीड वर्षांपूर्वी यातील एकाला तडिपारीचा आदेश होता. मात्र, त्याला उच्च न्यायालयाने जामीन दिल्याने त्याने पुन्हा आपला धंदा जोमात सुरू केला असून, त्यानेच इतर छोटे कसायांचे धंदे बंद करून स्वतःचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मित्रांची दादागिरी
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्या पथकात दोनच कर्मचारी असून, त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र स्वतःला अधिकारी समजून इतरांवर दादागिरी करत असल्याचीही माहिती मिळाली. रात्रीची गस्त घालत असताना पाण्याच्या बाटलीमध्ये दारू ओतून ती पित असल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत.
“प्रभात’च्या वृत्तानंतर खळबळ
शनिवारी शंकर संगमनेरात ठाण मांडून बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु त्याने अवैध धंदे करणाऱ्याला काही दिवस थांबून भेट घेतो, असे सांगून सध्याचे वातावरण गढूळ झाले आहे असे सांगितले. तर दैनिक प्रभातच्या वृत्तानंतर प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.