नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. निमित्त ठरले, ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांचा एकाच विमानातून झालेला प्रवास. शरद पवार यांच्या १२ डिसेंबरच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला अजितदादांनी हजेरी लावल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या (शरद पवार आणि अजित पवार गट) राजकीय भवितव्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दिल्लीतील स्नेहभोजनानंतर ‘दादा-पुतण्या’ एकत्र – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. समाजकारण, उद्योग आणि क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या स्नेहभोजनाला अजित पवारांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली. सर्वाधिक चर्चा रंगली ती काही महिन्यांपूर्वी एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आणि रोहित पवार यांनी केलेल्या एकत्र प्रवासाची. दिल्लीतील कार्यक्रमावरून हे दोन्ही नेते एकाच गाडीतून विमानतळावर पोहोचले आणि एकाच विमानातून नागपूरला आले. नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने दोघांनाही वेळेत अधिवेशनासाठी हजर राहायचे होते. रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया – या एकत्र प्रवासावर रोहित पवार यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया ताईंनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. अजित दादांसोबत एकत्र येण्याचा मुद्दा केवळ नागपुरात पोहोचणे हा होता. विमानांचा सध्या गोंधळ सुरू असल्यामुळे वेळेत नागपूरला पोहोचणे आवश्यक होते. म्हणून मी अजित पवारांसोबत प्रवास केला,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रवासादरम्यान कुठल्याही राजकीय चर्चा झाल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. “आमच्या परिवारात झालेला लग्न सोहळा, दिल्लीतील प्रदूषण आणि इतर सामाजिक विषयांवर चर्चा झाली,” असे रोहित पवार म्हणाले. दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील का, या प्रश्नावर रोहित पवारांनी थेट भूमिका मांडली. “मागील अडीच वर्षांपूर्वी आमचा पक्ष फुटला. तेव्हापासूनच दोन्ही पवार गट एकत्र येणार का अशी चर्चा रंगत असते. मात्र आजपर्यंत तसे काहीही घडलेले नाही. ही प्रसार माध्यमांमध्ये असलेली केवळ राजकीय चर्चा सुरू असते.” “आम्ही एका परिवारातले असल्यामुळे विविध कौटुंबिक कार्यक्रमांसाठी एकत्र येत असतो. याचा अर्थ राजकीय दृष्ट्या एकत्र येणे हा नसतो. केवळ राजकीय चर्चा रंगत असल्याचे,” रोहित पवार यांनी स्पष्ट केले. कुटुंबात मनभेद नसले तरी राजकीय मार्ग वेगळे असल्याचे संकेत त्यांनी दिले. या नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठींमुळे कार्यकर्त्यांमध्ये एकोप्याचे चित्र दिसत असले तरी, राजकीय स्तरावर मात्र दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता रोहित पवारांनी फेटाळली आहे. या एकत्र प्रवासाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर अधिवेशनात दोन्ही गट जनतेचे प्रश्न कसे मांडतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.