कोपरगाव – दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. तसेच मंगळवारी कोपरगाव दौऱ्यावर विविध कामांच्या उद्घाटन प्रसंगी आलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे देखील गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी आ. काळे यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेत गोदावरी कालव्यांना शनिवार (दि.०९) पासून सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले.
पाटबंधारे विभागाकडून १ जानेवारी रोजी आवर्तन सोडण्याचे निश्चित होते. परंतु कोपरगाव मतदारसंघात चालूवर्षी कमी पर्जन्यमान झाले असल्यामुळे मतदार संघात दुष्काळजन्य परिस्थिती असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी पिकांवर लागल्या आहेत. परंतु अशा परिस्थितीत रब्बी पिकांना वेळेवर पाणी मिळणे गरजेचे असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडणार आहे. त्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी तातडीने आवर्तन मिळावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात देखील अतिशय कमी पाणी शिल्लक राहिल्यामुळे अडचणी निर्माण होणार होत्या. त्यामुळे एकूण परिस्थिती व शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तातडीने गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लावून धरली होती.
पालकमंत्र्यांनी बैठक घेवून पाटबंधारे विभागाला गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार शनिवार (दि.०९) पासून बिगर सिंचन व रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. प्रथम बिगर सिंचन त्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. या आवर्तनातून सर्व पाणी पुरवठा करणारे लहान-मोठे सर्वच साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत. सात नंबर पाणी मागणी अर्ज करणाऱ्या टेल टू हेड सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तनाचा लाभ द्यावा, अशा सूचना आ. आशुतोष काळे पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.