राहुरी – कांदा निर्यातीसाठी चाळीस टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने त्वरित रद्द करावे; अन्यथा बाजार समितीत कांदाउत्पादक कांदा विक्रीसाठी आणणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (रविवार) दिला.
केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर कांदा लिलावदेखील बंद पाडण्यात आले. या वेळी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आंदोलकांनी दहन केले.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, कारखान्याचे माजी संचालक विजय डौले, दीपक तनपुरे, सत्यवान पवार, राऊ तनपुरे, आनंद वाणे, विजय तोडमल, सचिन म्हसे, सुनील इंगळे, दिनेश वराळे, सचिन गडगुळे, सूरज नलावडे, भारत गोरे, रवींद्र निमसे, बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब निमसे, विनायक शेळके, सतीश बोंबले, चांगदेव येसेकर आदी उपस्थित होते. या वेळी पोलीस व शेतकऱ्यांत चांगली बाचाबाची झाली.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष मोरे म्हणाले की, केंद्राने शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे कांदा निर्यात बंदी होण्याची भीती आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्र सरकारने जाणून घेतलेल्या नाहीत. प्रतिकिलोला दहा रुपये उत्पादित खर्च असताना गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. आता कुठे भाव सुधारण्याचे चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, सरकारला हे खपत नाही.
या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. हे सरकार केवल ग्राहक हिताचे रक्षण करते. कांदा निर्यात शुल्काने कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने जीएसटी, पेट्रोल, डिझेलवरील दर कमी करावेत. चैनीच्या वस्तूंची खरेदीने मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडत नाही, तर ते केवल कांद्यानेच कसे काय कोलमडते, असा प्रश्न त्यांनी केला.
कांदा निर्यात शुल्क सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा कांदा विकणार नाही, अशी शपथ सर्व शेतकऱ्यांनी या वेळी घेतली.
बाजार समिती सभापती अरुण तनपुरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. आम्ही त्यांच्या भावनांची कदर करतो. शेतकरी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
अश्रू अनावर
या वेळी रवींद्र मोरे यांनी बीड येथील एका शेतकऱ्याच्या मुलीने शाळेत जाण्यासाठी पाससाठी दोनशे रुपये नसल्याने आत्महत्या केल्याचे सांगत असतानाच त्यांना अश्रू अनावर झाले.