मुंबई -लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्या सामन्यानंतर विराट कोहली व गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात घडलेल्या वादावर आता क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई खूपच सौम्य आहे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच बीसीसीआयने अशा घटना हलक्यात घेऊ नयेत, या घटनेला जबाबदार असलेल्या या तिघांवर यापेक्षाही जास्त कठोर कारवाई होणे गरजेचे होते, असेही गावसकर म्हणाले.
कोहलीवर सामना रकमेच्या शंभर टक्के रकमेचा दंड केला, गंभीरला 50 टक्के तर नवीनला 25 टक्के दंड केला गेला. मात्र, हे पुरेसे नाही. त्यांच्यात जे घडले त्यामुळे खेळभावनेलाच धक्का लागला. ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली गेली पाहिजे तरच अन्य खेळाडूंना जरब बसेल. कोहलीला या स्पर्धेत 16 सामने खेळल्यावर 17 कोटी रुपये मिळतात. बाकीच्यांच्या करारातील रकमेची मला माहिती नाही; एक किंवा दोन सामन्यांची बंदी लावली गेली पाहिजे होती. शिक्षा कठोर असेल तरच पुन्हा अशा चुका होत नाहीत, असेही गावसकर म्हणाले.
मध्यस्थीस शास्त्री तयार
गौतम गंभीर व विराट कोहली दोघेही मोठे खेळाडू आहेत. नवीन नवोदित असला तरीही चांगला खेळाडू आहे. अशा घटनांमुळे अनावश्यक वाद निर्माण होतात. हे सर्व लवकरात लवकर संपले पाहिजे. यात कोणीतरी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. मला जर कोणी सांगितले तर मी यात मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे मत भारतीय संघाचे माजी कसोटीपटू व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.