– हिमांशू
कधी-कधी वाटतं हा संपूर्ण देशच एक प्रयोगशाळा झालाय आणि शक्य तेवढ्या बनावट गोष्टींचे प्रयोग समाजावर करून पाहिले जात आहेत. फेक औषधांपासून फेक न्यूजपर्यंत वाट्टेल ते खपतंय आपल्याकडे! “मुलं पळवणारी टोळी आली,’ अशी हूल कुणीतरी उठवतो आणि गावागावांत अनोळखी व्यक्तींना बेदम मारहाण व्हायला सुरुवात होते.
काहीजणांचा त्यात दुर्दैवी अंतही होतो. समजणाऱ्या एखाद्या माहितीविषयी समाज किती “संवेदनशील’ आहे याची टेस्ट काहीजण घेत असावेत, असा दाट संशय अशा घटना पाहून येतो. सोशल मीडियाचा वापर तर बहुतांश अशा गोष्टींसाठीच केला गेला आणि आजही बऱ्याच ठिकाणी लोक अशा धादांत खोट्या बातम्यांवर आणि माहितीवर विश्वास ठेवतायत.
सोशल मीडिया विशेषतः व्हॉट्सऍप हाच जगातला माहितीचा एकमेव विश्वसनीय स्रोत असावा अशी काहींची ठाम समजूत असते. फेक न्यूजप्रमाणेच या देशात फेक लसीसुद्धा टोचल्या गेल्या. लसींच्या रिकाम्या बाटल्या नियमाप्रमाणे नष्ट न करता त्यात ग्लुकोजचं पाणी भरून ते लोकांना टोचलं गेलं.
संपूर्ण जगावर कोसळलेल्या एका महाप्रचंड संकटाच्या काळातसुद्धा गल्लाभरू लोकांना अशी कृत्यं करताना पाहिलं की भविष्याची चिंता अधिक गडद होते. भावी पिढ्यांच्या ताटात काय-काय वाढून ठेवलंय, याबद्दल धास्ती वाटू लागते. खोट्याची प्रयोगशाळा बनलेल्या आपल्या समाजात प्रयोगशाळाही खोट्या वागतात, असे अनेक ठिकाणी दिसून आलंय.
उत्तराखंडमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी बनावट करोना चाचण्या मोठ्या प्रमाणावर झाल्याचं निष्पन्न झालंय. राजकीय चिखलफेकीनं गाजलेला कुंभमेळा आता आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाने गाजतोय. सक्तवसुली संचालनालयाने याप्रकरणी जागोजागी छापे टाकले आणि प्रयोगशाळांचे पितळ उघडे पडले.
दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या या प्रयोगशाळा आहेत. अनेकजण कुंभमेळ्याला नव्हते; पण त्यांची करोना चाचणी झाल्याचे कागदोपत्री दिसतंय. बोगस चाचण्यांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार झाला असून, उत्तराखंड सरकारने चाचण्यांसाठी दिलेल्या तीन कोटींपेक्षा अधिक निधीपैकी बराच निधी या प्रयोगशाळांनी चाचण्या न करताच लाटल्याचा आरोप आहे.
स्पेसिमन रेफरल फॉर्ममध्ये बनावट नाव-पत्ते आणि अन्य माहिती नोंदवली गेली. प्रत्यक्षात चाचण्या न करताच अनेकांच्या चाचण्या झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेले. यात रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर दोहोंचा समावेश आहे. प्रयोगशाळांनी लोकांच्या बनावट फॉर्मबरोबरच बनावट बिलंही तयार केली होती आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी आता अशी बिलं ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
छाप्यांमध्ये बनावट बिलांबरोबरच काही लॅपटॉप, मोबाइल, मालमत्तांची कागदपत्रं आणि तीस लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम अधिकाऱ्यांच्या हाती लागलीय. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात पॉझिटिव्हिटी रेट 5.3 टक्के होता आणि बनावट चाचण्यांमुळे तो अवघा 0.18 टक्केच दिसतोय.
हरिद्वारला न गेलेल्या पंजाबातल्या एका व्यक्तीला करोना टेस्ट केल्याचा मेसेज आल्यामुळे हा घोटाळा उघड झाला.
भारताची मोठी बाजारपेठ सगळ्यांनाच आकर्षित करते हे खरं; पण इथल्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येची मानसिकता ही आता बनावट मालाची आणि गोष्टींची बाजारपेठ ठरू लागलीय. “लांडगा आला रे आला’सारखे बनवेगिरीचे असंख्य प्रयोग इथल्या जनतेवर रोजच्या रोज होत असताना आता करोनासारख्या संवेदनशील बाबींमध्येही आपण “प्रयोगशाळा’च ठरतो आहोत ही दुर्दैवाची बाब आहे.