– हिमांशू
आज नारळीपौर्णिमा. रक्षाबंधनाचा दिवस. “आमचं रक्षण कर,’ अशी विनंती सागराला करून आजच्या दिवशी मच्छीमार बांधव त्याला नारळ अर्पण करतात आणि उसळत्या लाटांवर स्वार होतात, तर बहिणीही भावांना राखी बांधून आपलं रक्षण करण्याचं वचन त्याच्याकडून घेतात. “जीवो जीवस्य जीवनम्’ हा सृष्टीचा नियम असला आणि प्रत्येक सजीव अन्य सजीवांवर अवलंबून असला तरी संपूर्ण सजीवसृष्टी टिकली पाहिजे, दीर्घायू झाली पाहिजे अशी उदात्त शिकवण आपल्या संस्कृतीनं आपल्याला दिलीय. शेतकरी उदरनिर्वाहासाठी ज्या जमिनीवर अवलंबून असतो, तिलाही तो अधूनमधून विश्रांती देतो आणि जमिनीच्या उदरात वाढणाऱ्या उपयुक्त जीवाणूंना वाढीची संधी देतो. मग ते जीवाणू भरघोस पिकं देतात. थोडक्यात, आपल्या प्रत्येकात एक “रक्षणकर्ता’ असतोच आणि हे जग त्याच्याच आधारावर चालतं. विकासाच्या कॉंक्रिटी संकल्पना स्वीकारल्यापासून आपल्यातला हाच “रक्षणकर्ता’ क्षीण झाला.
नैसर्गिक साधनसंपत्ती अक्षरशः ओरबाडून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. बेसुमार वृक्षतोड आणि जमीनवापरातील बदल आपल्याला श्रीमंत करून गेले; पण आपला भोवताल अधिकाधिक कंगाल झाला. या प्रक्रियेचे चटके वातावरण बदलाच्या रूपानं बसू लागल्यावर आपल्याला रक्षणाचं महत्त्व समजू लागलं; पण दैनंदिन जीवनात आपल्यातला “रक्षणकर्ता’ निद्रिस्तच राहिला. शहरी जंटलमन प्लॅस्टिकच्या रॅपरमधले चिप्स चघळत राहिले; पण गावखेड्यातल्या साध्यासुध्या माणसांनी रक्षाबंधनाच्या तोंडावरच त्यांच्यातला “रक्षणकर्ता’ जागा असल्याचं अथक प्रयत्नांमधून दाखवून दिलं.
घटना आहे गुजरात किनारपट्टीवरच्या मोर नावाच्या छोट्याशा गावातली. भरतीच्या लाटांबरोबर एक बेबी व्हेल म्हणजे देवमाशाचं पिलू किनाऱ्यावर येऊन चिखलात अडकून बसलं. देवमाशाचा आकार विचारात घेता हे “बेबी’सुद्धा चांगलं 25 फूट लांबीचं आणि तितकंच अवजड होतं. किनाऱ्यावरच्या मच्छीमारांनी त्या पिलाचं तडफडणं पाहून तिकडे धाव घेतली आणि हाका मारून इतर गावकऱ्यांना बोलावून घेतलं. पाण्याशिवाय बेबी व्हेल जगू शकणार नाही म्हणून त्याच्या तोंडात गावकरी बादलीनं पाणी ओतत राहिले. कुदळ-फावडी आणून माशाच्या भोवताली खड्डे खणले. त्यात समुद्राचं पाणी आणून ओतलं आणि एक कृत्रिम तळं तयार केलं, तेही खाऱ्या पाण्याचं.
मासेमारीची जाळी आणि दोरीच्या सहाय्यानं बेबी व्हेलला या छोट्याशा तळ्यात आणलं. विशेष म्हणजे यासाठी संपूर्ण गाव रात्रभर गडद अंधारात काम करत होता. यथावकाश या गावकऱ्यांच्या मदतीला वन विभागाची रेस्क्यू टीम आली. सर्वांनी मिळून जेसीबीच्या मदतीनं बेबी व्हेलला उचलून छोट्या बोटीत ठेवलं आणि खोल समुद्रात सोडलं. फक्त एक जीव वाचवायचा म्हणून सगळे गावकरी 24 तास संघर्ष करत राहिले. आपल्या संस्कृतीचं खऱ्या अर्थानं दर्शन घडवलं.
खरं तर सागर किनाऱ्यावरच्या बहुसंख्य लोकांच्या भोजनातला मासा हा अविभाज्य घटक. माशांचं तडफडणं डोळ्यांना सवयीचं झालेलं. या पार्श्वभूमीचा विचार करता, 24 तासांच्या मेहनतीनं या मंडळींनी दोन टन वजनाच्या देवमाशाला दिलेलं जीवदान हे देवकार्यच ठरतं. “जियो और जीने दो’ या उदात्त शिकवणुकीचं इतकं मार्मिक दर्शन हल्लीच्या समाजात अभावानेच घडतं. अशा घटनांचा मनावर सखोल परिणाम होण्याचे दिवस सरले असले, तरी हे पाहून आपल्यातला “रक्षणकर्ता’ जागा व्हावा, याच रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा!