पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू, वाढत्या रुग्णसंख्येने अधिकारी, कर्मचाऱ्यांना धास्ती
सातारा (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व 11 तालुका पंचायत समित्यांमधील 326 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या “हॉटस्पॉट’ ठरू लागल्याने वाढत्या रुग्णसंख्येने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात सहा महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ग्रामीण भागात बाधितांना सुविधा मिळवून देताना या अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील 59 कर्मचारी बाधिता झाले आहेत. तर इतर तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये पाटण 61, कोरेगाव 58, कराड 48, महाबळेश्वर 28, खटाव 21, खंडाळा 17, जावळी 6, फलटण 15, माण 10, वाई 12, असे विविध विभागातील 326 अधिकारी, कर्मचारी बाधित झाले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोरेगाव पंचायत समिती एक, पाटण पंचायत समिती दोन, जावळी पंचायत समिती एक, सातारा पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
बाधितांमध्ये कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी,ग्रामसेवक, आरोग्यसेवक, लिपिक, शिपाई, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आदींचा समावेश आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपाययोजना राबवताना आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने ग्रामीण भागात जास्तीज जास्त सुविधा पुरवण्याला प्राधान्य देत असताना पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित आढळत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजी घेऊन उपाययोजनांमध्ये सहभाग घ्यावा. करोनाबाधित आणि मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषद प्रशासन जास्तीत जास्त मदत आणि सुविधा पुरवण्यावर भर देत आहे.
– उदय कबुले, (अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा)