सोनई, (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजले आहेत. जलजीवन योजनेची पाण्याची टाकी ग्रामस्थांच्या मागणीनुसार 200 मीटर बदलण्यात आलेली आहे.त्यासंदर्भातली आवश्यक ती कागदपत्रे वेळोवेळी देऊनही अधिकारी पुन्हा पुन्हा कागदपत्र मागत आहेत.
संबंधित कागदपत्राच्या पीडीएफ सर्व अभियंत्यांना पाठवलेल्या असतानाही काम मात्र रखडलेले आहे. योजनेचे अभियंते रमेश आंबेडकर,धगधगे व सौरभ तापकिरे यांच्यामार्फत हा सर्व प्रकार चालू आहे. ठेकेदार अनिल केंद्रे आणि अभियंते यांची मिलीभगत असून सदरचे काम जाणीवपूर्वक रखडले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
यासंबंधीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी येरकर, जिल्हाधिकारी सालीमठ, तहसीलदार बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाणी यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे. संबंधित अधिकारी यावर काही ॲक्शन घेणार का, असा प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने प्रशासकीय यंत्रणेला विचारण्यात येत आहे.