नाणे मावळ (वार्ताहर) – मावळ तालुक्यात सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते आहे. पण याच पिवळ्या धम्मक आंब्यांमध्ये काही घातक रसायनांचा सर्रास वापर होत असल्याचे आंब्याच्या रंगावरून दिसून येते. हे रसायन शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे मावळातील शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे अशी चर्चा चौकात-चौकात, लग्न सोहळ्यामध्ये होत आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फळे रसायाचा वापर करून पिकवली जात आहेत. कच्च्या आंब्याचा रंग बदलण्यासाठी, आंबा लवकर पिकावा यासाठी विविध प्रकारची रसायने वापरली जात आहेत. अशा रसायनामुळे ४८ तासांच्या आत आंबे पिकत असल्याची चर्चा होत आहे.
गावरान आंबा वगळता सध्या बाजारात घातक रसायनाचा वापर केलेले आंबे हातगाडीवर पहायला मिळत आहे. त्यांचा रंगही पिवळा धम्मक आहे. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले हे आंबे त्वरीत न वापरल्यास ते खराब होत आहेत. अशाच अंब्यांचा रस ग्राहकांना दिला जात आहे. तसेच रसासनांचा वापर करून आंबे पिकलेले असल्याने त्याचा शरीरावरही घातक परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या लग्न सराई सुरू असून अनेक ठिकाणी आंब्याच्या रसाचा बेत दिसत आहे. मात्र, रसासाठी वापरले जाणारे आंबे कृत्रिमरित्या पिकवलेले आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेलाही मोठ्या प्रमाणात रसाची दुकाने असून वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आंब्याच्या रसाला पसंती दिली जात आहे. मात्र, हे रस पिताना नागरिकांनीही सावधान असावे. शक्यतो विश्वास असलेल्याच ठिकाणी आंबे खरेदी करावी.
अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
मावळ तालुक्यात व इतर काही भागात रस्त्याच्या कडेला सध्या मोठ्या प्रमाणावर रसाची दुकाने पहायला मिळत आहेत. तसेच आंबा विक्रीची दाकानेही आहेत. बहुतांश दुकानांमधून असे आंबे विक्रीसाठी आहेत. मावळ तालुक्यात केसर, हापूस ,केशर, आंबे दिसून येतात.
१०० रुपयांपासून तर ३०० रुपये डझनापर्यंत या आंब्याचे भाव असून, आंबा घेताना पारखून घेण्याची गरज आहे. कार्बाइडचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांना कारवाई करणार कोण, त्यासाठी सक्षम यंत्रणा आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन यावर कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
बाजारात सध्या पिवळ्या रंगांचे आंबे विक्रीसाठी दिसत आहेत. हे आंबे नैसर्गिक रित्या पिकवलेले दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आंबे खरेदी करताना विशेष सावध राहिले पाहिजे. तसेच आंबा व्यापाऱ्यांनी रसायनांचा वापर टाळला पाहिजे. नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवूनच बाजारात त्याची विक्री करावी. त्यातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहिलच. शिवाय कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. – नवनाथ नाणेकर, युवा उद्योजक.