सातारा, (प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासकांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे भवानी तलाव अर्थात सातारा पालिकेचा जलतरण तलाव गेली अकरा वर्ष बंदच आहे. तलावाच्या अद्ययावतीकरणाची इच्छाशक्ती नसल्यामुळे अल्प दरात उपलब्ध होणारा जलतरण तलाव कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.
राजवाड्याजवळील नगरपालिकेच्या या तलावात अनेक जण पोहणे शिकले. दरवर्षींच्या उन्हाळ्यात बच्चेकंपनीसह विविध वयोगटातील अनेक जण पोहण्याचा आनंद घेत असतं. मा, काही वर्षांपूर्वीपासून या तालावाचा उपयोग गणपती विसर्जनासाठी होऊ लागला. निसर्जन झाल्यावर तलाव स्वच्छ करम्याचे काम पहिले एकदोन वर्षे झाले.
पण नंतर मात्र, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने त्याकडे दुल्क्ष केले. आणि पोहण्याचा हक्काचा तलाव सर्वसामान्यांपासून दूरच गेला. एप्रिल महिना आला की नगरपालिकेच्या जलतरण तलावाकडे बालगोपाळांचे पाय वळत होते. अवघ्या दहा रुपयांमध्ये सातारा शहरातील तरुण, लहान मुले या तलावाचा उन्हाळ्यात आनंद घेत असतं. मात्र, ही परंपरा गेल्या अकरा वर्षांपासून त्या खंडित झाली आहे.
तत्कालीन उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सातारा पालिकेच्या जलतरण तलावासाठी 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव ती तरतूद अन्यत्र वळवण्यात आली. पूर्वीच्या काळात राजवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी खेळण्यासाठी या भवानी तलावाची निर्मिती झाली होती. कालांतराने त्याचे जलतरण तलावात रूपांतर करण्यात आले
पालिकेचे प्रशासक अभिजित बापट यांना जलतरण तलावाच्या दुरुस्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा जलतरण तलाव चालवणे पालिकेचे काम नाही असे उत्तर त्यांनी दिले होते. सध्या या भवानी तलावाचा उपयोग गणेशोत्सवाच्या काळात केवळ गणपती विसर्जनासाठी केला जातो. मे 2013 मध्ये या तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता.
त्यामुळे गेली अकरा वर्ष भवानी तलाव कोरडाच पाहण्याची दुर्दैवी वेळ सातारकरांवर आली आहे. एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा या कालावधीत हा तलाव सुरु व्हायचा. या तलावाशिवाय सध्या शहरात केवळ शाहू क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आहे. मात्र, त्याची फी तब्बल 2200 असल्याने तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही.
पालिकेने पोहण्याचा आनंद द्यावा…
या भवानी तलावाच्या अद्ययावतीकरणासाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अडीच कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, याचे श्रेय भाजपच्या नगरसेवकांना जाईल म्हणून सत्ताधाऱयांनी हा प्रकल्प गुंडाळून ठेवला असे सांगण्यात येते. फुटका तलाव वगळता बच्चे कंपनीला साताऱ्यात पोहण्याची कोठेही सोय नाही, फुटका तलावाची खोली अधिक असल्यामुळे आणि सुरक्षेची साधने नसल्याने तेथेही पोहणे धोकादायक आहे.
त्यामुळे सातारा पालिकेच्या प्रशासकांनी सातारकरांच्या सोयीसाठी भवानी तलावाचे आधुनिकीकरण करावे, याकरता साधारण दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असा बांधकाम विभागाचा अहवाल आहे. करदात्यांना पालिकेची सेवा मिळणार नसेल तर आम्ही कर भरावा का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पालिकेने किमान हालचाली करुन याच हंगामात पोहण्याचा तलाव सुरु करुन बालगोपाळांना आनंद मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.