पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र्य, वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा जवळपास एक हजार उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. अन्य उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे या नवनियुक्त तलाठ्यांना निवडणूक कामकाजातही सहभागी करून घेण्यात येणार आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर प्रश्न- उत्तरांबाबत आक्षेप मागविण्यात आले आणि त्यांचे निराकरण करण्यात आले.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली अशा २३ जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
दि. १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली. त्यानुसार जिल्हा निवड समितीकडून आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमारे एक हजार उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्तिपत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जाणार आहेत.
दरम्यान, उर्वरित जिल्ह्यांमधील पेसावगळता इतर उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहिता काळात निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी सुरू राहणार आहे. गरज पडल्यास नवनियुक्त तलाठ्यांना निवडणूकविषयक कामकाजात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
तलाठी परीक्षेतील निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे, अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्तिपत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जातील, अशी माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.