संगमनेर, (प्रतिनिधी) – शहरातील जोर्वेनाक्यानंतर आता दिल्लीनाका परिसरात मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एका समाजातील जमावाने तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही जमावाने मारहाण केल्याने संगमनेर तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा तणावाखाली आले होते.
मात्र, रात्री उशिरा त्या जमावावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान राहुल सोपान गुंजाळ (रा.कोल्हेवाडी रोड, सुकेवाडी, ता. संगमनेर) हे त्यांच्या दोन लहान मुली घेऊन दुचाकीहून एका वाढदिवसाला चालले होते.
यावेळी नाटकी नाल्याजवळ असताना त्यांच्या पाठीमागून नंबर नसलेली एका पिकअप गाडी आली आणि कट मारून निघुन गेली. पुढे गतिरोधक असल्याने पिकअपचा वेग कमी झाला तेव्हा गुंजाळ यांनी पिकअप चालकाकडे पाहिले.
त्या क्षणी तो म्हणाला, की माझ्याकडे काय बघतो? असे म्हणत शिविगाळ करू लागला. मात्र, दुर्लक्ष करून सोबत मुली असल्यामुळे गुंजाळ पुढे निघाले. मात्र, पिकअप चालक अल्फाज शेख याने गाडी जोरात घेऊन त्यांना आडवी मारली. गाडीची चावी काढून घेत कोणताही प्रश्न न करता मोठमोठ्याने शिविगाळ करीत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, त्याने फोन काढून तेथील काही व्यक्तींना कॉल केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात नाटकी परिसरात कोणी तलवार, कोणी कुऱ्हाडी, कोणी लाकडे तर कोणी लोखंडी रॉड घेऊन सात ते आठजण आले.
त्यांनी गुंजाळ यांना मारहाण सुरू केली. तेवढ्यात रस्त्याने अमोल गुंजाळ, संदीप गुंजाळ, संकेत कोरडे, रवि गुंजाळ हे आले. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना देखील सशस्त्र आलेल्या आठ जणांनी मारहाण सुरू केली. तर, पिकअप चालक शेख याने त्याच्या हातातील तलवार अमोल गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी उगारली. मात्र, तो वार चुकला म्हणून अमोल वाचला. तेव्हा अमोलने घटनास्थळाहून काढता पाय घेतला.
याचदरम्यान, कोल्हेवाडी रोड परिसरात प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यामुळे पिकअप चालकाने देखील तेथून पळ काढला. त्यानंतर राहुल गुंजाळ यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पिकअप चालक अल्फाज शेख, अरबाज कुरेशी, समद कुरेशी (रा. संगमनेर) यांच्यासह पाच जणांना आरोपी केले आहे.
या घटनेने रात्रभर संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलीस स्टेशनमध्ये हिंदुत्ववादी संघटनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर शांतता प्रस्थापित झाली.