सांगवी, (वार्ताहर) – जुनी सांगवी येथील मुळा नदीवरील सांगवी-बोपोडी मार्गावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामाची मुदत जानेवारी 2024 मध्येच संपली आहे. परंतु अद्याप पुलाचे काम अर्धवट आहे. मात्र, या पुलामुळे पुणे शहर परिसर जोडला जाणारा असून, सांगवीच्या इतर रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
बोपोडीकडील बाजूच्या रस्त्यामध्ये सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्राची शेतकरी भवनची मोडकळीस आलेली इमारत अद्यापही निष्क्रिय केलेली नाही. त्यामुळे या पुलाचे काम होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या कामातील इमारतीचा अडथळा दूर करून रस्ता लवकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
या रखडलेल्या कामामुळे ठेकेदारास पुन्हा नव्याने 3 महिन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. परंतु मुदतवाढ मिळूनही पुलाचे काम पुढे सरकू शकलेले नाही. परिणामी पुलाच्या कामाचा कालावधी अकारण वाढत आहे. त्यामुळे सांगवी व बोपोडीला जोडणारा पूल व रस्त्याचे काम त्वरित होणे गरजेचे आहे.
बोपोडीकडील भागात पोहोच रस्त्याच्या पुलाच्या मधोमध असलेली व मोडकळीस आलेली इमारत अद्यापही न पाडल्यामुळे या कामात मोठा विलंब होत आहे. हा विलंब टाळून पुलावर वाहतूक सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित विभाग व महापालिका प्रशासनाला योग्य ते निर्देश देऊन हा अडथळा दूर करावा.
सध्या हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव ही वाहतूक सांगवी मार्गे पूर्व पुण्याकडे, पुणे स्टेशन, येरवडा, कॅम्पकडे जाणारी सर्व वाहतूक पुणे विद्यापीठ, औंध रस्ता सांगवी मार्गे जाईल. त्यामुळे सांगवीतील अन्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
छत्रपती संभाजी महाराज पुलावर कोंडी
सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव या भागाला जोडणार्या सांगवी फाटा या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी म्हणून सांगवी येथील स्पायसर कॉलेज रस्त्यावर व छत्रपती संभाजी महाराज पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावरून जाणार्या सर्व बसेस स्पायसर कॉलेज मार्गाने वळविण्यात आल्यामुळे या पुलाबरोबर रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला असून, नेहमीच वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत.
सांगवी-बोपोडी मार्गावर मुळा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. परंतु जानेवारीतच या पुलाच्या कामाची मुदत संपली आहे. आता पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु या पुलाच्या कामातील अडथळे काढून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे. यामुळे सांगवीतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. – अतुल शितोळे, माजी नगरसेवक.