पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रमुख १२५ चौकांमध्ये अत्याधुनिक यंत्रणेचे सिग्नल उभारले आहेत. मात्र, त्याची वेळ अर्थात टाइमर गायब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना लाल रेघा मोजून आणि अचानक कधीही हिरवा सिग्नल सुरू होईल, या धास्तीने वाहने न्यावी लागत आहेत.
नवीन सिग्नल बसल्यानंतर त्याचे सिंक्रोनायझेशनच केले नसल्याने कोणताही सिग्नल कधीही सुरू होत आहेत. परिणामी, नियोजन होण्याऐवजी कोंडी वाढत आहे. अचानक सिग्नल बदलत असल्याने अपघातही होत आहेत. या नवीन एका सिग्नलसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च आहे. त्यासाठीचा पुढील देखभाल दुरूस्तीचा सुमारे ५७ कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. शहरात सुमारे १२५ सिग्नल बसविण्यात येणार असून, त्यातील ११३ सिग्नल उभारण्यात आले आहेत.
हे सिग्नल बसविताना ते सेंसर आणि कॅमेरा असणारे आहेत. त्यामुळे एका चौकातून पुढील चौकात जाणारी वाहने हा कॅमेरा मोजून त्यानुसार पुढील सिग्नलवर ही वाहनांची माहिती पाठवेल. त्यानुसार, हा सिग्नल आपल्या वेळेत स्वत: बदल करेल आणि ज्या दिशेने जादा वाहने असतील, त्या दिशेची वेळ ठरवेल. हे काम दोन टप्प्यांमध्ये केले जाणार होते.
त्यातील एक टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील १२ सिग्नल उभारणे बाकी आहे. मात्र, या सर्वच सिग्नलचे टाइमर बंद आहेत. त्यामुळे लाल दिव्यानंतर हिरवा दिवा कधी लागेल, याचीचा अंदाजच येत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडत आहे. तर हिरवा दिवा लागल्यानंतरही टाइमर सुरू असला, तरी अचानक त्याचा वेळा कमी जास्त होत आहेत. परिणामी, वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
जोड रस्त्यांचा विसर
महापालिकेकडून ही सिग्नल यंत्रणा उभारताना केवळ शहरातील प्रमुख १५ रस्त्यांचा विचार केला आहे. मात्र, त्यांना जोडणार्या रस्त्यावरून या मुख्य रस्त्यावर वाहनांचा विचार या यंत्रणेत करण्यात आलेला नाही. परिणामी, जोड रस्ते असलेल्या अनेक चौकांत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. यात बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, सेनापती बापट रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्गसन महाविद्यालय रस्ता, कर्वे रस्त्याचा समावेश असून, या जोड रस्त्यांना असलेली सिग्नलची वेळ अनेक ठिकाणी १५ सेंकदापेक्षाही कमी आहे. त्यामुळे, सिग्नलच्या नादात अनेक वाहने लाला दिवा लागल्यानंतरही चौकात येत असल्याने कोंडी होत आहे.
“सिग्नल यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जे काम सुरू आहे, ते वगळता इतर ठिकाणी ते कार्यरत असणे आवश्यक आहे. हे अत्याधुनिक सिग्नल असल्याने त्याचे टाइमर सुरू असणे आवश्यकच आहे. याबाबत तातडीने स्मार्ट सिटी प्रशासनाला कळवले जाईल.” – श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग