पुणे – राज्य शासनाच्या शाळा दत्तक योजनेच्या निर्णयाला तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाने राज्य शासनाकडे केली आहे. सर्वसामान्य व मध्यमवर्गीय पालकांची मुले सरकारी शाळांमधून शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका महापालिका व स्थानिक प्राधिकरणाच्या शाळांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या असून या समस्यांना विद्यार्थी व शिक्षकांना यांचा सामना करावा लागत आहे.
शाळा दत्तक योजना व शाळा समूह योजना अध्यादेशातून शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे स्थानिक प्राधिकरणांच्या शाळांचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचे नुकसान होणार आहे. खासगी कंपन्यांना शाळा दत्तक देण्यात येऊ नयेत. शासनाने “आरटीई’चा कायदा व नियम यांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी मागणी महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष दीपाली सरदेशमुख यांनी शासनाकडे केली आहे.