दोन दिवसांत खुलासाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नगर – कर्तव्यात कसून केल्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळ यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून येत्या दोन दिवसात खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत.
नगर शहरात 23 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी साचू नये, तसेच पावसाचे पाणी साचून वाहतुकीस व नागरिकांना अडथळा होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात हयगय केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. कर्तव्यात कसूर केल्याबाबत जबाबदारी निश्चित करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई का करू नये, असा जाब विचारला आहे.
नगर शहरात 23 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. स्टेशन रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाखाली चांदणी चौक ते मार्केटयार्ड या परिसरात पावसाचे पाणी साचले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे. उड्डाणपुल तयार करताना तसेच वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर उड्डाणपुलाखालील रस्ता व लगतच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल, पाणी साचून वाहतुकीस व नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक होते.
उड्डाणपुलाखाली पावसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदीस्त नाले तयार करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधणे आवश्यक होते. मात्र, यात हयगय केल्याचे निदर्शनास आले असून, आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या विषयास गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते, असे नोटीसीत म्हटले आहे.
कर्तव्यात कसूर केल्याने जबाबदारी निश्चित करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 56 मधील तरतूदीनुसार कारवाई का करू नये, याबाबतचा लेखी खुलासा दोन दिवसात सादर करावा. उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, तसा अहवाल देण्याचे सांगितले आहे.