– डॉ. मेघश्री दळवी
बेडकाची एक गोष्ट आहे. त्याला उकळत्या पाण्यात टाकलं तर तो लगेच बाहेर उडी मारेल. कारण तापमानातला हा प्रचंड फरक तो सहन करू शकणार नाही. उलट त्याला पाणी भरलेल्या भांड्यात ठेवून पाणी हळूहळू गरम केलं तर बेडूक मरेपर्यंत पाण्यातच राहील. सुरुवातीचं किंचित उष्ण पाणी सहन करण्याचा तो प्रयत्न करेल. ते जमलं की आणखी थोडी उष्णता सहन करेल. पण ज्यावेळी त्याचं शरीर उकळतं पाणी सहन करणं थांबवेल त्या परिसीमेपर्यंत पोहोचल्याचं त्याला कळणारच नाही!
ग्लोबल वॉर्मिंगबाबत ही गोष्ट नेहमी सांगितली जाते. अलीकडेच युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी इशारा दिला आहे की आपण आता ग्लोबल वॉर्मिंग नाही तर ग्लोबल बॉयलिंगच्या युगात प्रवेश केला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तापमान 51 अंश सेल्शिअसवर गेल्याने इराणमध्ये दोन दिवस लॉकडाऊन लावला होता. इतर ठिकाणीही अशी वेळ येऊ शकते. त्यामुळे हवामानाची कोणती पातळी आपण सहन करू शकतो याचा गंभीरपणे विचार करायला सुरुवात झाली आहे. डीप क्लायमेट एक्सपिडिशन या प्रयोगात 10 पुरुष आणि 10 स्त्रियांच्या गटाला तीन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये कसे अनुभव येतात याच्या नोंदी घेतल्या. तिन्ही मोहिमांमध्ये कठीण प्रवास आणि टोकाचं हवामान होतं. जगभरातील नागरिकांना यापुढे याच प्रकारचे अनुभव येणार आहेत या दृष्टीने या प्रयोगाची आखणी केली होती.
पहिल्या मोहिमेत ऍमेझोन रेनफॉरेस्टमधून छोट्या बोटीने आणि चालत 150 किलोमीटर प्रवास करायचा होता. उष्ण आणि दमट हवामानाचा या गटाने सामना केला. दुसऱ्या मोहिमेत फिनलंड आणि नॉर्वेमध्ये 240 किमी स्कीइंग आणि स्लेज ओढून न्यायची होती. हा आर्क्टिक सर्कलचा प्रदेश असल्याने साहजिकच हवामान थंड आणि अत्यंत कोरडं होतं. तिसऱ्या मोहिमेत सौदी अरेबियातील किंग सलमान रिझर्व्हमधल्या रखरखीत वाळवंटात त्यांना 250 किमी प्रवास करायचा होता, तेही जड सामान ओढून नेत. जून 2023 मध्ये संपलेल्या या खडतर प्रवासात त्यांना दर दिवशी आठ लिटर पाण्याची गरज भासली होती.
अजूनही या प्रयोगातील डेटाचं पूर्ण विश्लेषण व्हायचं आहे. पण सुरुवातीचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. रेनफॉरेस्टमध्ये तगून राहिलेले काही लोक थंड वातावरणात मात्र धडपडत होते. तापमान 48 अंशांपर्यंत पोहोचल्यावर फक्त सकाळी 5 ते 10 दरम्यान प्रवास करणे शक्य होतं. त्यानंतर पुन्हा तापमान कमी होईपर्यंत या गटाला सुरक्षित जागी शक्य तितकं स्थिर बसून राहावं लागलं. प्रवासात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम दिसून आला. परिस्थितीशी जुळवून घेताना सहकार्य आणि सहानुभूती सर्वात महत्त्वाची ठरली. असे आणखी प्रयोग होणार आहेत आणि त्यातून भविष्यासाठी तयारी करायला आपल्याला बरेच उपयुक्त धडे मिळतील अशी आशा आहे.