नगर – जिल्ह्यात डोळे येण्याच्या आजाराचा झपाट्याने संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली असून अवघ्या सहा दिवसात ग्रामीण भागात 3681 जणांचे डोळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात डोळे आलेल्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तब्बल 4 हजार 958 रुग्ण संख्या झाली आहे.
राज्यभरात डोळे येण्याची साथ झपाट्याने पसरत आहे. जिल्ह्यामध्येही कंजक्टिव्हिटीज म्हणजेच डोळे येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 1 ऑगस्टपासून ग्रामीण भागात डोळे येणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर आशा वर्कर मार्फत हा सर्वे केला जात आहे. एक दिवसात 785 जणांना डोळे आले आहेत. अर्थात जे शासकीय रुग्णालयात जात आहेत. तो आकडा आरोग्य विभागाकडे येत आहे. मात्र अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने डोळे आलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे म्हणाले, डोळे येण्याची साथ पसरत आहे, परंतु रुग्णांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे तसेच तत्काळ उपचार घ्यावेत. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये एप्लीकॅप निंबोळी ट्यूब तसेच डोळ्यांसाठी आवश्यक ड्रॉप्स उपलब्ध आहेत. नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेतून उपाय योजना हाती घेण्यात आले आहेत, असे सांगितले.
अकोले, संगमनेर, श्रीरामपूरमध्ये सर्वाधिक फैलाव
नगर मनपा हद्द 253, अकोले 773, जामखेड 248, कर्जत 264, कोपरगाव 159, नगर 251, नेवासे 255, पारनेर 550, पाथर्डी 217, राहता 395, राहुरी 259, संगमनेर 1003, शेवगाव 111, श्रीगोंदे 337, श्रीरामपूर 783 डोळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत. तर 2375 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.जिल्ह्यात डोळे येणे या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ऍडीनो वायरसमुळे होते. डोळे आल्यानंतर आठ ते दहा दिवस लक्षणे असतात. डोळे लाल होणे, चिपड येणे, टोचल्यासारखे होणे, पापण्यांना सूज येणे, आदी लक्षणे आहेत. त्यामुळे तत्काळ उपचार आवश्यक आहे. डोळे चोळू नये, काळा चष्मा वापरावा व सातत्याने हात धुवावेत.