आपल्या गावासाठी काही तरी भव्यदिव्य करावे, गावाचा विकास झाला तर राज्याचा अन् देशाचा विकास होईल. गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवणे. गावात विकास योजना राबवून या विकासाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचावणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजूनच समाजकार्य करत राहणे. आपल्या पदाचा व अधिकाराचा जनतेच्या हितासाठीच उपयोग करणे हेच एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सरपंचपदाचे शिवधनुष्य हाती घेतले आणि गावच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सर्वसामान्य महिलांसाठी आधार बनल्या.
त्यांच्या संकटसमयी धावून जाऊन मदतीचा हात पुढे करणाऱ्या आपल्या गावातील विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलेल्या महिला सरपंच म्हणून अल्पावधीत एक वेगळा ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे श्री समर्थ सद्गुरू श्रीपतीबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन व पुनीत झालेल्या खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे गावच्या माजी सरपंच सौ. मंगल राजेंद्र भोसले. त्यांची गावच्या विकासाला आलेली गती पाहता हे महिला नेतृत्व निश्चितपणे भविष्यात यशस्वी वाटचाल चालत राहून गावचा सर्वांगीण विकास साधून त्या यशस्वी झाल्या, असे गावातील लोकांना वाटते.
फार मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा अगदी लहान लहान गोष्टींपासून तत्कालीन सरपंच सौ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीने परिवर्तनास सुरुवात केली. वास्तविक अध्यात्माचा पाया गावाला असल्याने कळस चढविणे अशक्य नव्हते. मात्र, अवघड होते. गेली अनेक वर्षे आरोग्य, शिक्षण या मूलभूत समस्यांच्या यशस्वी पूर्ततेसाठी ग्रामपंचायतच काय संपूर्ण देशच लढतो आहे. हे काम पूर्णत्वास नेताना ग्रामपंचायतीला प्रचंड त्रास झाला. मात्र, “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला’! या उक्तीप्रमाणे मिळालेल्या संधीचे सोने करायचे हेच ध्येय मंगल भोसले यांच्या डोळ्यासमोर होते. ग्रामपंचायत बॉडीला गाव विसरल तरी चालेल. मात्र, ग्रामपंचायतीची कामे कायमस्वरूपी गावच्या विकासप्रक्रियेत लोकांच्या स्मरणात राहतील याच उद्देशाने झपाटून भोसले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने कामाला सुरुवात केली.
जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था पाहून इंग्लिश मीडियमच्या तोडीची इमारत व्हावी ही अपेक्षा होती. गावातील सर्वच मंदिरांचा, धार्मिक स्थळांचा यापूर्वी जीर्णोद्धार केला. मात्र, ज्ञानाचे व संस्काराचे मंदिर दिमाखात उभे राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. विशेष म्हणजे शाळेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक परप्रांतीय मुले असताना ही या ज्ञानमंदिराकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी ग्रामपंचायतीने घेतली.
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ।। सात्विकतेचा व संस्काराचा अंश देण्याच काम प्राथमिक शाळा करीत असते आणि म्हणून तुम्हा आम्हला हेवा वाटावा अशा देखण्या शाळेचे भूमिपूजन झाले. कै. शामराव शंकरराव इंगळे इनामदार व स्व. भूपेंद्र शामराव इंगळे इनामदार यांच्या शाशवत स्मृती कायम या माध्यमातून ग्रामपंचायतीला ऊर्जा देतील. तसेच राजेंद्र बापू इंगळे इनामदार व संपूर्ण त्यांच्या परिवाराच्या सहकार्याच्या बळावर ही शाळा उभी राहात असल्याचे मंगल भोसले यांनी आवर्जून सांगितले.
गावच्या शाश्वत विकासात सहयात्री व्हा
गावात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली असून काही कामे पूर्णत्वाच्या दिशेने केवळ ग्रामपंचायतीचे सहकारी आणि ग्रामस्थांच्या साथीने वेगाने वाटचाल करीत आहे. तसेच या विकासकामांच्या मांदियाळीसाठी आमदार दिलीप मोहिते पाटील पाठीशी उभे राहिले. प्रशासकीय कामांचा पाठपुरवा करताना प्रचंड धावपळ होते. मात्र, आमदार मोहिते यांच्या मार्गदर्शनाने अनेक कामे सोपी झाली, असे सरपंच मंगल भोसले आवर्जून सांगतात. तसेच आमदार मोहिते यांच्या मार्गदर्शनखाली काम करीत राहू. गावातील सर्वच छोटे-मोठे वाद विसरून गावच्या शाश्वत विकासात सहयात्री व्हा, असे आवाहन सरपंच भोसले यांनी केले आहे.
विकासकामांची मांदियाळी
बंदिस्त गटार योजना, वाड्यावस्त्यांवर कॉंक्रिट रस्त्यांचे जाळे, नळ पाणीपुरवठा विस्तार योजना, रस्त्यांच्या कडेने पेव्हिंग ब्लॉक बसविणे, चेकर्स टाइल्स बसवणे, सौर दिवे कार्यान्वित करणे, सोलर प्लॅंट विस्तारीकरण, महिला व बालकल्याण निधीतून विविध प्रशिक्षणे, गावातील सार्वजनिक ठिकाणी सिमेंट बाकडे बसवणे, इंद्रायणी नदीकाठी विहीर पुनर्बांधणी, सौर हायमास्ट दिवे बसवणे, सार्वजिक ठिकाणे सुशोभिकरण, धार्मिक स्थळांवर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा अशा हजारो कामांची मांदियाळी निर्माण केली.
प्रशासकीय इमारतीचे काम…
घराची कळा अंगण सांगते. याप्रमाणे सुसज्ज प्रशासकीय इमारत हे कित्येक वर्षांचे समस्त ग्रामस्थांचे स्वप्न होते. महाळुंगे गावच्या परंपरेला शोभणारी प्रशासकीय इमारतीचे काम ग्रामपंचायत हाती घेत आहे. या माध्यमातून गावाला सर्व संगणीकरणयुक्त सुविधा देण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीचे असल्याचे तत्कालीन सरपंच मंगल भोसले यांनी सांगितले.
साठवण टाकीचे लवकरच उद्घाटन
गावची वाढती लोकसंख्या, शहरीकरणाकडे झुकलेला भाग यामुळे कित्येक वर्षे पाणीटंचाईत गावाने काढले. खरे तर माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा तब्बल दोन तपानंतर ग्रामपंचायतीने ध्यास घेतला. पाण्याची उपलब्धता असून केवळ झोळी फाटकी ठेवून चालणार नव्हती. त्यासाठी निःस्वार्थीपणाची पाईक होऊन हेमंत नाइकनवरे यांच्या सहकार्यातून 20 लाख लिटर पाण्याची साठवण क्षमता असणाऱ्या टाकीचे उद्घाटन लवकरच होणार आहे.
संकलन : राजेंद्र सुरसे, महाळुंगे इंगळे