पुणे -घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दरड कोसळण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर डोंगर भागातील वाड्या-वस्त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत घाटमाथ्यावर काही भागांत अतिमुसळधार पाऊस झाला. कोयना परिसरात सर्वाधिक 189, तर ताम्हिणी घाटात 140 मि.मी. पावसाची नोंद झाली.
पुणे जिल्ह्यात 23 गावे ही दरडप्रवणक्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील तीन गावे अतिधोकादायक असल्याने त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील फुलवडे, भगतवाडी, जांभोळी-काळवाडी, पोखरी-बेढारवाडी, माळीण अंतर्गत पसारवाडी, खेड तालुक्यात भोरगिरी अंतर्गत पदरवास्ती, भोमाळे, मावळमध्ये माऊ गबळे वस्ती, मोरमाची वाडी, भोरमधील जांभूळवाडी, पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली, मुळशीत घुटके, वेल्ह्यात आंबवणे, जुन्नरमध्ये तळमाची वाडी अशी गावांची नावे आहेत. तर अन्य गावातील वाड्या-वस्त्यांवरही दरड पडण्याची भिती असून, त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
रस्ते निसरडे झाल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना नागरिकांनी सतर्क रहावे, विशेषत: लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि तरुणांनी काळजीपूर्वक पर्यटन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरडप्रवणक्षेत्रात रात्रीचा प्रवास टाळावा, रस्त्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहत असेल तर प्रवास करू नये, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
घाटमाथ्यावरील पाऊस (मिमीमध्ये)
लोणावळा – 118, शिरगाव – 100, वळवण – 103, अंबवणे – 140, धावडी-127, डुंगरवाडी-122, कोयना-189, खोपोली-135, खंद-133, ताम्हिणी -140, भिरा-94, धारावी-93