नवी दिल्ली – ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. येथे दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, दोन महिलांची विवस्त्र धिंड आणि त्यांच्यावरील अत्याचार प्रकरणी मुख्य गुन्हेगारासह आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. हुइरेम हेरोदास मेईती असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींनाही पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून, लवकरच ते देखील पोलिसांच्या हाती लागतील.
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रात्रभर छापे टाकून गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर, गावकऱ्यांनी आरोपी हुइरेम हेरोदास मेईती याच्या घराला आग लावली आणि त्याच्या कुटुंबालाही बहिष्कृत केले असल्याचे माहिती समोर आली आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार का होतोय ?
1 मणिपूरमधील मेईतेई, नागा आणि कुकी हे तीन प्रमुख समुदाय आहेत.
2 मेईतेई बहुतेक हिंदू आहेत आणि ते ओबीसी वर्गात येतात. मेईतेई लोकांची लोकसंख्याही राज्यात जास्त आहे. राज्यातील नागा आणि कुकी हे बहुसंख्य ख्रिश्चन आहेत आणि ते दोघेही अनुसूचित जमातीत येतात.
3 राज्यातील मेईतेईची लोकसंख्या सुमारे 60% आहे आणि हा समुदाय इंफाळ खोऱ्यात राहतो.
4 राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% भागात मेईतेई समुदाय राहतो आणि उर्वरित 90% डोंगराळ आहे. कुकी आणि नागा समुदायांसह राज्यातील सुमारे 40% लोकसंख्या येथे स्थायिक आहे.
5 डोंगरावर नागा आणि कुकीसह 30 हून अधिक लहान-मोठ्या जमाती आहेत. हा समाज अनुसूचित जमातीत येतो. त्यांच्याकडे अनेक सुविधा आहेत आणि ते फक्त डोंगराळ भागात राहू शकतात.
6 मेईतेई समाजाचा त्याला विरोध आहे. राहण्यासाठी जमीन कमी असल्याने आम्हालाही एसटीचा दर्जा मिळावा, असे त्यांचे म्हणणे आहे. एसटीचा दर्जा मिळाला तर. त्यामुळे ते डोंगरावर स्थलांतरित होऊ शकतील.