काटेवाडी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडी येथे आगमन होताच पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन धोतरांच्या पायघड्यांमध्ये ही पालखी ओठा येथे आणण्यात आली. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी पुढे धोतराच्या पायघड्या घालण्याचा मान परीट समाजाच्या ननवरे बंधूंना आहे. परंपरेनुसार पालखी समोर ननवरे बंधूंच्या वतीने धोतराच्या पायघड्या घातल्या गेल्या.
काटेवाडी गावच्या शिवेवर शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार व उद्योगपती रणजीत पवार यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. बारामती येथील मुक्काम संपल्यानंतर सोमवारी (दि. 19) श्री संत तुकाराम महाराजांची पालखी मोतीबाग, बांदलवाडी, पिंपळी, लिमटेक या गावांमधून काटेवाडी येथे दुपारी बारा वाजता आली.
यावेळी काटेवाडी गावच्या शिवेवर शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार व रणजीत पवार यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, शितल काटे, जितेंद्र काटे, प्रशांत काटे, सोमनाथ माने, अनिल काटे, सुनील काटे, दत्तात्रय काटे, दादा भिसे, सुरज काटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, पोलीस पाटील सचिन मोरे आदी उपस्थित होते.
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पालखी ओठा येथे विसावल्यानंतर गावातील नागरिकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी भक्ती भावाने दर्शन घेतले असून विसावा संपल्यानंतर दुपारी तीन वाजता ही पालखी भवानीनगर कडे मार्गस्थ होणार आहे.