येरवडा, दि. 24 (प्रतिनिधी) -जाहिरातींचे होर्डिंग्ज सर्व नागरिकांना दिसावेत, यासाठी रस्ता दुभाजकावरील सुमारे 25 झाडांची अनधिकृतपणे कत्तल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही वृक्ष अंदाजे पाच ते सहा वर्षांची होती. खराडी येथील ईऑन आयटी पार्क फेज-टू येथे घडलेल्या या प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे.
शहरात एकीकडे वाढते प्रदूषण आणि अन्य पर्यावरणीय बाबी नागरिकांच्या दृष्टीने चिंतेच्या झाल्या आहेत. पण, काही ठिकाणी कोणत्याची परिणामांची चिंता न करता वृक्षतोडी सारख्या पर्यावरणविरोधी कृती वाढत आहेत. त्याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे ही घटना ठरली आहे. तर, काही महत्त्वाच्या ठिकाणी अडथळा ठरणारी एखादी फांदी तोडण्यासाठी सामान्य नागरिकांना महापालिकेत अर्ज करून परवानगीसाठी दोन-तीन महिने वाट पाहावी लागते. मात्र, वर्दळ असलेल्या रस्त्यावर खुलेआम झाडाची कत्तल केली जाते याकडे पालिका दुर्लक्ष करते. ही घटना गंभीर असून कारवाई केवळ कागदावरच करू नये, त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
याबाबत पक्षाच्यावतीने नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना निवेदन देण्यात आले आहे. “या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई दोन दिवसांत न झाल्यास संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, असे गृहीत धरून यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे,’ अशी भूमिका मनसेने घेतली आहे.