राजेंद्र वाघ यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार लाभला आहे. पण हे पुरस्कार पदरात पडून घेण्यासाठी त्यांनी सचोटीने काम केलं आहे. आयुष्याशी संघर्ष केला आहे. त्यांची कविता या संघर्षातून उमटली आहे. सुखासीन माणसे कविता लिहिताना दिसत नाही. कष्टकऱ्यांची, श्रमिकांची कविता अधिक तेजोमय रूप घेऊन अवतरते. राजेंद्र वाघ हे श्रमिक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कवितेला एक आगळीवेगळी धार आहे.
जीवन, मशाल, निर्भय या तीन कवितासंग्रहानंतर आलेला राजेंद्र वाघ यांचा चौथा कवितासंग्रह. या कवितासंग्रहाची सौंदर्यस्थळं सांगायची म्हटलं तर ही कविता श्रमिकांची आहे. ही कविता माणसांची आहे. मानवतावाद हा या कवितेचा आत्मा आहे. कवी कुटुंबव्यवस्थेवर प्रेम करतो म्हणूनच यात आई, वडील, बायको, मुलगी, घर अशा कविता येतात. “तू’ हे एकाक्षरी शीर्षक घेऊन लिहिलेल्या कवितेत त्यांनी जी भावना व्यक्त केली आहे ती विश्वव्यापी आहे. कारण तिच्यासोबतीने आयुष्याची नौका किनाऱ्याला नेणे हेच प्रत्येकाचं अंतिम ध्येय असतं. पण त्याने हे अंतिम ध्येय बाळगताना तिनेही शीड व्हायला हवं आणि अखंड सोबतीचं वारं शिडात भरून घ्यायला हवं. माणूस यंत्रामागे धावताना यंत्र होतो. पण पैशामागे धावताना पैसा होत नाही. आयुष्याचा जमाखर्च मांडताना हाती शून्यच उरतं आणि रिकाम्या हातानेच मातीत मिसळावं लागतं हे वास्तव आहे. याच आशयाच्या भावना श्रमिकांचं गोंदण या शीर्षक कवितेत उमटल्या आहेत.
मशीनवर काम करता करता
मशीन कधी झालो कळलेच नाही
या त्या कवितेतल्या ओळीच पुरेशा बोलक्या आहेत. परंतु या ओळी त्यांच्या स्वतःसाठी नसून भोवतालासाठी असाव्यात असं दिसतंय. कारण संपूर्ण कवितासंग्रह वाचताना राजेंद्र वाघ हे कुठेही मशीन झाल्याचं दिसत नाही. त्यांच्यातला माणूस अजून जिवंत आहे म्हणूनच तो श्रमिकांचं, माणुसकीचं गाणं गाणाऱ्या कविता लिहितो आहे. शेतकऱ्यांचं राज्य येत नाही. त्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही तोवर लोकशाही आली म्हणण्याला काही अर्थ नाही. याच आशयाच्या भावना त्यांच्या लोकशाही या कवितेत उमटल्या आहेत. कवितेच्या सुरुवातीला शेतकऱ्याची व्यथा मांडताना वाघ म्हणतात-
बळीराजे बळी जातात
बळीराण्यांच्या बांगड्या फुटतात
“घामाचे दाम’ या कवितेतील –
व्यर्थ चर्चा हवी कशाला
दोन हातांना काम द्या
हार तुरे नको आम्हाला
न्यायनीतीने काम द्या
या ओळीची कष्टकऱ्यांची बाजू उचलून धरतात.
आशावाद हा या कवितांचा केंद्रबिंदू आहे. देखणी निर्मिती, समर्पक मुखपृष्ठ यादेखील या काव्यसंग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत.