नवी दिल्ली – देशात नुकताच 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, असून देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5-जी सेवा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. तसेच 5-जी सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्याने विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी वैष्णव म्हणाले, पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशभरात 5-जी सेवा पोहचण्याचे आमचे ध्येय आहे. 5-जी सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही आम्ही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे आम्ही लक्ष देत आहोत, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.
5-जी सेवा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दूरसंचार ऑपरेटर त्या दृष्टीने काम करत आहेत. इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण झाले आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5-जी सेवा सुरु होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर टप्याटप्याने शहरी आणि ग्रामीण भागामध्ये या सेवाचा विस्तार करण्यात येईल. 5-जी सेवा सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल, असे त्यांनी सांगितले.
भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या 13 शहरात सर्वात आधी 5-जी सेवा
दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी 5-जी सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये मुंबई पुणे, अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता आणि लखनऊ या शहरांचा समावेश आहे.