नवी दिल्ली – आपण 21व्या शतकातील संधी आणि आव्हानांसाठी सज्ज होत असताना आपली शिक्षण आणि कौशल्यविषयक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान लाभ घेतला पहिले, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. प्रधान यांनी आज राष्ट्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटन सत्राला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
शालेय शिक्षण हे ज्ञानाधारित समाजाचा पाया आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण हे ज्ञानाचा दस्तावेज असून सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि प्रत्येकाला शिक्षण प्रदान करणे हा या धोरणाचा उद्देश आहे, असे प्रधान यांनी यावेळी सांगितले.
आपण सध्या अमृतकाळाच्या युगात असून जागतिक हिताच्या दृष्टीने भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आणण्यासाठी पुढील 25 वर्षे महत्त्वाची आहेत. भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकम या तत्वावर विश्वास ठेवते आणि आपली जबाबदारी केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आपण बांधील आहोत हे ध्यानात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा, पूर्व प्राथमिक शाळा ते माध्यमिक शाळा असा 5+3+3+4 समग्र दृष्टिकोन, बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, प्रौढ साक्षरता, शालेय शिक्षणात कौशल्यविकास शिक्षणाचा अंतर्भाव आणि मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य या 21व्या शतकातील जागतिक नागरिक घडवण्याच्या पायऱ्या आहेत, असं मत प्रधान यांनी व्यक्त केले.