शिमला -देशात 2014 या वर्षाच्या आधी भ्रष्टाचार हा सरकारचा अविभाज्य भाग मानला जायचा. मात्र, आमच्या सरकारने भ्रष्टाचार बिल्कूल खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे मागील आठ वर्षांपासून देश मोठा बदल अनुभवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले.
केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत मोदी बोलत होते. सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी आमच्या सरकारने विविध पाऊले उचलली. लाभार्थींच्या याद्यांमधून तब्बल नऊ कोटी बनावट नावे वगळण्यात आली.
देशात आठ वर्षांपूर्वी विविध घोटाळ्यांच्या बातम्या पुढे यायच्या. आता सरकारचे भ्रष्टाचारविरोधी धोरण आणि विकास योजना यांची चर्चा होते. देशातील गरिबी कमी होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थाही ते मान्य करतात, असा दावाही त्यांनी केला.
देशाच्या सीमाही आता अधिक सुरक्षित बनल्या आहेत. आता भारत इतर देशांपुढे अपरिहार्यतेपोटी नव्हे; तर त्यांना मदत करण्यासाठी मैत्रीचा हात पुढे करतो, असे म्हणत त्यांनी भारताने अनेक देशांना करोना लसी पुरवल्याचे उदाहरण दिले. मी स्वत:ला पंतप्रधान नव्हे; तर प्रधानसेवक समजतो. देशातील 130 कोटी जनता म्हणजे एक कुटूंब आहे. त्या कुटूंबाचा मी एक सदस्य आहे. त्या कुटूंबासाठीच मी माझे जीवन वाहिले आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.