इंदूर – मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका निवासी इमारतीला भीषण आग लागली होती. यामध्ये एका जोडप्यासह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीची ही दुर्घटना शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. आपल्या प्रेयसीचा विवाह अन्य इसमाशी ठरल्याने रागाच्या भरात एका तरुणाने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या तरुणाला आता अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सकाळी ही माहिती दिली.
विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘स्वर्ण बाग कॉलनीतील एका निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेतील आरोपी शुभम दीक्षित उर्फ संजय (२७) याला शनिवार-रविवार दरम्यानच्या मध्यरात्री लोहमंडी परिसरातून अटक करण्यात आली.
काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित हा मूळचा उत्तर प्रदेशातील झाशीचा असून तो मागील काही काळापासून इंदूरमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होते.
दरम्यान, दीक्षित याच्यावर शहरातील महाराजा यशवंतराव शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये त्याच्या एका हातातून आणि पायातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसत आहे.
आग लावून सात जणांना ठार केल्याच्या घटनेतील आरोपी दीक्षित लोहमंडी परिसरात पोलीस पथकाला पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्यावर दुभाजक उडी मारताना पडून जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस अधिकारी काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लावल्यानंतर फरार झालेला दीक्षित निरंजनपूर येथील त्याच्या मित्राच्या घरी लपला होता.
एका महिलेशी लग्न करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर तिचा बदला घेण्याच्या उद्देशाने दीक्षितने स्वर्ण बाग कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली तिची स्कूटर शुक्रवार-शनिवार दरम्यानच्या मध्यरात्री पेटवून दिली होती. आगीने नंतर भीषण रूप धारण केल्याने मोठी दुर्घटना झाली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत एका जोडप्यासह सात जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. पोलिसांनी दीक्षित विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या) आणि 436 (इमारतीला आग लावण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थाचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दीक्षित सहा महिन्यांपूर्वी आगग्रस्त निवासी इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून राहत होता आणि त्याला इमारतीत राहणाऱ्या एका महिलेशी लग्न करायचे होते, परंतु महिलेचे लग्न अन्यत्र निश्चित करण्यात आल्याने दीक्षित रागात होता.
लग्नाच्या मुद्द्याव्यतिरिक्त, दीक्षित आणि संबंधित महिलेमध्ये काही दिवसांपूर्वी सुमारे 10,000 रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. आरोपी दीक्षित हा महिलेसोबत पैशाच्या वादातून सहा महिन्यांपूर्वी स्वर्ण बाग कॉलनीतील निवासी इमारत सोडून गेला होता.